Wednesday, December 31, 2008

चिमुकल्यांचा पुष्पोत्सव.
उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीला पाउस भिजवून ओला करतो आणि पावसाळ्यात सबंध जंगल आणि आसपासचा परिसर हिरवागार होऊन जातो. या काळात हिरव्या रंगाच्या एवढ्या अगणित छटा बघायला मिळतात की त्याची गणतीच नाही. श्रावणात मात्र ह्या हिरव्या रंगाच्या बरोबरच अनेक विविध रंगसुद्धा फुलांच्या रूपाने आपल्याला दिसतात. जंगलाचा प्रकार थोडासा बदलला की तिथल्या फुलांचे प्रकार बदलत जातात. अर्थात जागा किंवा जमिन जशी बदलते त्याप्रमाणे ही फुले आणि त्यांची फुलायची पद्धत बदलत जाते. दाट जंगलात गेलो तर तीथे वेगळ्या प्रकारची फुले दिसतात. गवताळ, उघड्या माळरानांवर गेलो तर ही फुले अजुन नाजूक आणि वेगळी असतात. डोंगरावर, पठारांवर, उंचीवर ही फुलझाडे अजुनच बारकीशी असतात आणि त्यांना फुलेसुद्धा तेवढीच लहानशी आणि रंगीबेरंगी येतात. गड किल्ल्यांच्या कडे कपारीत, खडकांवर अजुनच वेगळ्या जातीची फुले येतात. पाणथळीच्या जागी, तलावांच्या भोवती ह्या फुलांचे प्रकार बदलत जातात.
दाट जंगलांमधे सहसा ही फुलझाडे एकेकटी फुलतात. त्यामुळे अर्थातच त्यांना शोधावे लागते. काही झुडपे तर एवढी लहान आणि जमिनीलगत असतात की त्यांच्या साठी खास शोधमोहिमच आखावी लागते. पावसाळ्यातील ह्या सर्वच फुलझाडांची एक खासियत असते ती म्हणजे त्यांचे अस्तित्व संपुर्णपणे पावसाच्या पडण्यावर अवलंबून असते. थोडा जरी पाउस लांबला किंवा आधी झाला तर त्यांचा फुलण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. त्याचप्रमाणे त्यांचे आयुष्य एवढे कमी असते की काही काही फुलझाडांचे फुलणे अगदी २/४ दिवसात संपून जाते आणि मग थेट पुढच्या वर्षापर्यंत त्यांची वाट बघावी लागते. जंगलातील फुलांपेक्षा डोंगरावर, पठारांवर फुले येतात ती मोठ्या संख्येने येतात. एकाच ठिकाणी शेकडो झुडपे एकाच वेळेस फुलतात. चक्क एकाच विशिष्ट्य फुलांचा, विशिष्ट्य रंगाचा गालिचाच तिथे फुललेला दिसतो. अर्थात त्यांचेही आयुष्य कमी असल्याने खात्रीने ती नेमकी त्याच महिन्यात किंवा जास्त दिवस दिसतीलच असे नाही.
ह्या चिमुकल्या फुलांचे छायाचित्रण मात्र इतर किटक, फुलपाखरे, पक्षी यांच्यापेक्षा नक्कीच सोपे असते कारण एकदा का तुम्ही ती फुललेल्या जागेवर पोहोचलात की ती फुले तिथेच असल्यामुळे त्यांच्या मागेमागे जास्त फिरावे लागत नाही किंवा ती उडून गेली असेही होत नाही. असे असले तरी काही काही जातीची फुले ही अतिशय लहान आकाराची असतात आणि थोडा वारासुद्धा त्यांना गदागदा हलवतो. त्यामुळे त्यांचे छायाचित्रण फुरसतीत करावे लागते. बऱ्याच वेळेला पावसामुळे, वाऱ्यामुळे किंवा किटकांमुळे फुलांच्या पाकळ्या खराब झालेल्या असतात त्यामुळे जास्तीत जास्त चांगले फुल छायाचित्रणासाठी निवडावे लागते.
महाराष्ट्रातील जवळपास सगळे गड किल्ले, माथेरान, महाबळेश्वर किंवा कास ही या चिमुकल्या वन्य फुलांसाठी अतिशय योग्य ठिकाणे. या ठिकाणी पावसाळ्यातील दर महिन्यात एखादी चक्कर मारली तर दर वेळेस तुम्हाला ३०/४० जातीची फुले हमखास दिसतात. उत्तराखंडातील "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स"ला जाणे जमले नाही तर महाराष्ट्रातील कासच्या पुष्पपठारावर आपण सहज जाउ शकतो. एकतर अतिशय जवळ आणि मोठ्या संख्येने इथे फुले सहज बघायला मिळू शकतात. आतापर्यंत गेली कित्येक वर्षे मी जुलै ते सप्टेंबर या वेगवेगळ्या महिन्यात इथे बऱ्याच फेऱ्या मारल्या आहेत. दरवर्षी नवनविन जाती आणि छायाचित्रे कायम मिळत गेली आहेत. पावसाच्या हल्लीच्या लहरी स्वभावार जरी इथल्या फुलांचे फुलणे अवलंबून असले तरी आतापर्यंत माझी खेप कधीच फुकट गेलेली नाही. आतासुद्धा यावर्षी २०/२१ सप्टेंबर २००८ ला खास फुलांच्या छायाचित्रणासाठी जाण्यासाठी आयोजन सुरू आहे आणि आता यावर्षी नविन काय बघायला मिळणार याचीच उत्सुकता लागली आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment