Saturday, March 7, 2009

भूताचे झाड.....
या झाडाला मराठीत कांडोळ किंवा पांढरीचे झाड म्हणतात आणि इंग्रजीमधे "इंडियन घोस्ट ट्री" म्हणतात. या झाडाचे खोड पांढरेशुभ्र आणि काहिसे चंदेरी असते. ह्या तुळतुळीत खोडावर त्वचेवर भाजून काळे डाग पडावेत तसे व्रण असतात. अंधाऱ्या रात्री हे पांढरे, चंदेरी खोड चमकल्यासारखे दिसून काहीसे भयावह वाटते म्हणून हे "घोस्ट ट्री". या झाडाचा बुंधा अगदी आखीव रेखीव आणि छत्रीसारखा पसारा असलेला असतो. डिसेंबर - जानेवारीच्या सुमारास या झाडावर एकही पान नसते आणि फांदीच्या टोकाला मॉस (शेवाळे) गुंडाळल्यासारखा फुलोरा असतो. आता त्या पसाऱ्याला फुलोरा किंवा फुले का म्हणतात हा प्रश्नच आहे कारण लांबून ना त्यांचा आकार दिसतो ना अस्तित्व. अगदी जवळून निरिक्षण केल्यावर लक्षात येते की ती फुले चांदणीच्या आकाराची आणि अतिशय छोटी असतात. पाच पाकळ्यांची ही फुले हिरवट रंगाची असतात आणि थोडीफार त्यावर लालसर रंगाची नक्षी असते. जशी ही दिसायला अनाकर्षक आणि नगण्य असतात तसाच त्यांचा वासही घाण असतो, कारण या स्टर्कुलिया कुटूंबातील वृक्षांना दुर्गंध असतोच.
जेवढी ह्याची फुले अस्ताव्यस्त असतात तेवढीच यांची फळे व्यवस्थीत, निटनेटकी आणि आकर्षक असतात. जेंव्हा या झाडाला फळे धरायला लागतात तेंव्हा त्याचे सारे रूपच बदलून जाते. स्टारफीशसारखी किंवा पंचपाळ्यासारखी दिसणारी फळे अतिशय उठावदार किरमीजी रंगाची असतात आणि त्यावर मखमली लव असते. काही काही जातीत हा फळांचा रंग गुलाबी असतो. अतिशय साजरी दिसणारी ही फळे जरी मखमली भासत असली तरी ती लव एखाद्या काट्यासारखी रूपते. ही फळे थोडी मोठी होत असतानाच फांद्यांच्या टोकावर पालवी फुटायल लागते. पांढऱ्याशुभ्र झाडावर ही पोपटी हिरवीगार पालवी अगदी शोभून दिसते. या पानांचा आकारही पाच कोन असलेल्या द्राक्षासारखा पण थोडा विस्तारीत असतो. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतशी ही पालवी मोठी होऊन झाड हिरवेगार दिसायला लागते. फळांवर जशी लव असते तशीच लव ह्या पानांवरसुद्धा असते त्यामुळे ही स्पर्शाला अगदी मऊसुत लागतात.
तद्दन भारतीय असलेल्या या झाडाची साल आणि डिंक आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. ह्या झाडाची साल अतिश्य औषधी आहे आणि डायरियावर गुणकारी म्हणून वापरली जाते. दातांच्या कवळ्या बनवण्यासाठी साच्यांमधे पावडर टिकून रहाण्यासाठी याचा डिंक वापरला जातो. खाद्यपदार्थांच्या उद्योगातसुद्धा याचा डिंक वापरला जातो.
ह्या झाडाची माझी पहिली ओळख झाली ती ताडोबाच्या जंगलात. कॉलेजमधे असताना डब्लू.डब्लू.एफ़ च्या कॅंपला गेलो असताना ताडोबाच्या प्रवेशद्वारापाशीच हा एक भलामोठा, पसरलेला वृक्ष होता आणि त्याच्या पारावरच आमची नोंदणी सुरू होती. असा पांढराशुभ्र, पसरलेला वृक्ष पहिल्यांदाच पहात असल्याने त्याच्य सौंदर्याने तो पटकन नजरेत भरला आणि कायमचा लक्षातसुद्धा राहीला. त्यानंतर आमच्या येऊरला आणि अनेक वेगवेगळ्या जंगलात परत परत भेटत गेला, प्रत्येक मोसमात त्याचे बदलणारे रूप न्याहाळताना, छायाचित्रण करताना वेगळाच अनुभव यायचा. येऊरच्या सुक्या धबधब्याच्या उतरंडीवर हा वृक्ष आहे. त्याला फळे धरल्यावर त्यांचे छायाचित्रण करायली गेलो असताना, ती फळे जरा जास्त उंचावर असल्यामुळे पाय उंचावून एका हाताने फांदी खाली खेचली आणि दुसऱ्या एकाच हाताने छायाचित्रण सुरू केले. मात्र ही कसरत करताना पायाखालची माती सरकली आणि वर फांदीवर धरलेला माझा हात खाली थेट फळांवर आला. आता जर फळांचे काटे टोचतात म्हणून फांदी सोडली असती तर मी कॅमेरासकट खाली कोसळलो असतो, त्यामुळे मला त्या काटेरी, टोचणाऱ्या फळांचा आधार घेउनच स्थिर व्हायला लागले. अर्थात या काळात काही मोजकी छायाचित्रे मिळाली होती पण त्यानंतर मात्र २/३ दिवस हातातले खाजणारे काटे काढण्यातच माझे गेले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Thursday, March 5, 2009

परोपजीवन.
परोपजीवन म्हटले की आपल्याला लगेच झाडांवरची बांडगुळे आठवतात. मात्र फुलपाखरासारख्या नाजूक आणि गोंडस किटकावरसुद्धा जगणारे बरेच परोपजीवी किटक आहेत. फुलपाखरांच्या अळ्या ह्या अशा परोपजीवी किटकांना पटकन बळी पडतात कारण त्यांची रचना ही परोपजीवी किटक वाढायला उपयोगी असते. एरवी यजमान आणि परोपजीवी प्राणी किंवा झाड दोघेही जगतात. मात्र फुलपाखरांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांच्यात यजमान अळी किंवा कोष हमखास मरतो आणि परोपजीवी किटकअगदी आनंदात आपली प्रजा वाढवतात. ह्या परोपजीवी माश्यांच्या यजमान अळ्या ठरलेल्या असतात. विशीष्ट्य जातीच्या अळ्यांवरच ते आपली अंडी अथवा कोष करतात. ब्रॅकोनिडी कुळातील माशी फुलपाखराच्या अळीला एक सूक्ष्म छिद्र पाडून त्यात अंडी घालतात. ही अंडी टाकायला त्यांच्याकडे तीक्ष्ण असा सुईसारखा अवयव त्यांच्या पोटाच्या टोकाशी असतो. ही अंडी आतल्या आत उबून आत अळीचे मांस अन्न म्हणून खायला सुरूवात करतात. प्रथम ते चरबी खातात, मग ते पचनसंस्था, मज्जासंस्था यांच्यावर हल्ला चढवतात. अशाप्रकारे ती फुलपाखराची अळी मरून जाते अथवा मलूल होते. यानंतर त्या अळ्या उरलेले मांस खातात आणि पुर्ण वाढ झाल्यावर तिथेच त्या अळीच्या मृत शरीरावर किंवा बाजूला सोनेरी किंवा पांढरे तांदळाच्या दाण्याएवढे कोष करतात. यथावकाश त्यातून त्या परोपजीवी माश्या बाहेर येतात.
टॅचनिडी कुळातील परोपजीवी माश्यासुद्धा काहीशी अशीच पद्धत वापरतात. पण जास्तीकरून त्या त्यांची अंडी अथवा अळ्या ह्या फुलपाखराच्या अळीच्या अन्नझाडावर टाकतात. मग या परोपजीवी अळ्या यजमान अळीला चिकटतात आणि स्वत:च तिच्या शरीरात शिरतात. माईटस जातीचे परोपजीवी किटक बाहेर राहून अळीच्या शरीरातील रस शोषून घेतात. कधी कधी कोषांनासुद्धा ह्या माश्या टोचून त्यात अंडी घालतात. ह्या परोपजीवी किटकांबरोबरच अळ्यांना इतरही रोग होऊ शकतात. बऱ्याचदा अळ्या मरगळलेल्या आणि सुरकुतलेल्या अवस्थेत टांगलेल्या दिसतात किंवा त्यांच्या शरीरातून एक चिकट द्राव आलेला दिसतो. असे होण्याची बरीच कारणे असू शकतात. एकाच झाडावर अळ्यांची जास्त गर्दी, अस्वच्छता, ओले खाणे अथवा उपासमार यामुळे असे रोग होतात. काही अळ्यांना व्हायरसमुळे किंवा बुरशीजन्य रोगसुद्धा होतात. ह्या सर्वांवर मात करूनही काही अळ्या यशस्वीपणे कोष करून मग त्यातून प्रौढ फुलपाखारू बाहेर येते आणि याच कारणासाठी मादीने जरूरीपेक्षा जास्त अंडी घातलेली असतात.
फुलपाखरांवर घडणाऱ्या या परोपजीवनाची छायाचित्रे निसर्गात क्वचीतच आणि नशीबाने मिळतात. सोबतच्या छायाचित्रात दिसणाऱ्या कॉमन नवाबच्या हिरव्या अळीच्या शरीरातून बाहेर येउन परोपजीवी माशीच्या पिवळसर अळ्या कापसासारख्या धाग्यांनी कोष विणत आहेत. त्यांनी एवढ्या सफाईने कॉमन नवाबच्या अळीचे शरीर खाल्ले होते की त्या तिचे शरीर फाडून बाहेर आल्यवरसुद्धा पुढे कित्येक वेळ ती अळी जिवंतच होती. असे होण्यासाठी या परोपजीवी अळ्यांचा जीवनक्रम एवढा जलद वाढतो की नवाबची अळी कोष करण्याच्या आधी त्यांना त्यांचा कोष करायचा असतो. त्यांचा कोषसुद्धा होतो तो नवाबच्या अळीच्या शरीराखालीच, बीचारी ती अळी मात्र त्यांच्या कोषावर मलूलपणे बसून रहाते. एकदा लिंबाच्या झाडावर लाईम जातीच्या फुलपाखराने कोष केला. काही दिवसानंतर कोष काहीसा काळपट झाला अर्थात दुसऱ्या दिवशी ते फुलपाखरू कोषातून बाहेर येण्याची ती लक्षणे होती. मी पहाटेपासून कोषावर लक्ष ठेवून बसलो होतो. मात्र कोषातून छानसे पिवळ्या, काळ्या रंगाचे फुलपाखरू बाहेर यायच्या ऐवजी अतिशय बारक्या काळ्या रंगाच्या माश्या एका छोट्या भोकातून बाहेर यायला लागल्या. त्या एका कोषातून २७ परोपजीवी माश्या त्या सकाळी बाहेर आल्या आणि मला मात्र फुलपाखराऐवजे त्या छोट्या माश्यांचीच बाहेर येतानाची अनेक छायाचित्रे मिळाली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

कामसू मधमाशी.
सगळ्याच किटकांचा आपल्या प्रत्यक्ष फायदा नसला तरी त्यांनी केलेल्या परागीभवनामुळे आपल्याला पिकांचे, फळांचे भरघोस उत्पादन मिळते. बदाम, सफरचंद, जरदाळू, कलींगड, खरबुज, आंबा, स्ट्रॉबेरी, मोसंबी, काकडी, वांगी, लाल भोपळा, मोहरी, सूर्यफुल अश्या अनेक पिकांच्या परागीभवनाकरता आणि अर्थात त्यनंतरच्या फलधारणेसाठी केवळ किटक आणि किटक यांचीच गरज असते. या परगीभवनात मधमाश्यांचा मोठा सहभाग असतो. मधमाश्या त्यांच्याकरता फुलांतील मध आणि त्यांच्या पिल्लांच्या वाढीसाठी फुलातील मकरंद गोळा करत असतात. या मधमाश्या जेंव्हा मधप्राशन करत असतात तेंव्हा आजुबाजुचे परागकण त्यांच्या शरीरावर चिकटतात आणि त्यांच्या पायावर असलेल्या खास "पराग परडीत" जमा होतात. मधमाशीची शरीररचना अशी काही निसर्गाने बनविली आहे की त्याचा जास्तीत जास्त फायदा फुलांना परागीभवनाकरता होतो. तिच्या शरीरावर आणि पायांवर असंख्य बारीकबारीक केस असतात. या केसांत अतिसुक्ष्म परागकण व्यवस्थीत चिकटून बसतात आणी जेंव्हा मधमाशी दुसऱ्या फुलाला भेट देते तेंव्हा तिथे या परागकणांचा संयोग होऊन परागीभवनाची शक्यता वाढते.
मधमाशीच्या पोळ्यामधे राणीमाशी, नर माश्या आणि कामकरी माश्या अशी वर्गवारी असते. राणीमाशीचे मुख्यकाम अंडी घालण्याचे असते. नर माश्या प्रजोत्पादनासाठी असतात तर कामकारी माश्या ह्या अप्रगत माद्या असतात. यांची संख्या सर्वात जास्त असून त्यांचे प्रमुख काम राणीची, पिल्लांची आणि पोळ्याची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे असे असते. याच माश्या बाहेर जाउन फुलांतील मध आणि मकरंद गोळा करण्याचे काम करतात. एका मोठ्या पोळ्यात अश्या ६०,००० पर्यंत अश्या कामकरी मधमाश्या असू शकतात. या सगळ्या माश्या पोळ्याच्या रक्षाणाकरता अथक परिश्रम करत असतात. मध आणि मकरंद गोळा करण्याचे कामसुद्धा खुप मेहेनतीचे आणि वेळखाउ असते. फुलांच्या ताटव्यापासून पोळ्यापर्यंतचे अंतर २/३ कि.मी. लांब सुद्धा असते. एकदा का एका कामकरी मधमाशीला फुलांचा ताटवा आणि त्यातला योग्य असा मधाचा साठा सापडतो तेंव्हा ती पोळ्यामधे परत येते आणि इतर माश्यांना ही उपयुक्त माहिती पुरवते. याकरता त्यांना त्यांच्या खास "नाचाची" भाषा वापरावी लागते. पोळ्यावर इंग्रजी आठच्या आकड्याप्रमाणे ती उडत रहाते आणि यावरून इतर माश्यांना त्या फुलांचे पोळ्यापासूनचे अंतर आणि दिशासुद्धा कळते आणि क्षणार्धात सगळी फौज सुसाट वेगाने नविन जागेवर मध गोळा करायला बाहेर पडते. कधी कधी कामकरी मधमाशी आपल्या तोंडातून दुसऱ्या मधमाशीला मध भरवून त्या मधाचे "सॅंपल"सुद्धा देतात. जंगलामधे किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्य कुठल्याप्रकारची फुले फुलली आहेत यावर बनणाऱ्या मधाचा प्रकार आणि चव ठरली जाते, म्हणजे जर त्या काळात जंगलात कारवीची फुले मोठ्या प्रमाणावर असतील तर बनणारा मध हा कारवीच्या गुणांनी बनलेला असतो. सध्या महाबळेश्वर आणि महाराष्टात इतरत्रही मोठ्या प्रमाणात मधुमक्षिकापालन केले जाते.
पुर्वी कर्नाळ्याच्या सुळक्यावर किंवा इतरही गड किल्ल्यांवर गिर्यारोहण करताना आग्या मधमाश्यांची मोठी मोठे पोळी दिसायची. त्यावेळेस त्या उठणार नाहीत, त्रास देणार नाहीत आणि आपल्या पाठी लागणार याची काळजी घेत होतो. आता मात्र छायाचित्रणासाठी या मधमाश्या जास्तीत जास्त कश्या दिसतील हाच विचार करत असतो. या माश्यांचे पोळे नेहेमी उंचावर असल्यामुळे सहसा त्यांचे जवळून छायाचित्रण शक्य होत नाही. मात्र एकेकट्या माश्या जेंव्हा फुलांवर घिरट्या घालताना दिसतात किंवा फुलांतील मध पिताना दिसतात तेंव्हा त्यांचे चांगले छायाचित्रण जमू शकते. कुठल्या फुलांमधे मध जास्त असतो आणि त्यावर या मधमाश्या आकर्षित होतात असे माहित असेल तर त्याठिकाणी जर आपण वाट बघत बसलो तर या मधमाश्यांची हमखास चांगली छायाचित्रे मिळतात. पण या मधमाश्यांचा उडण्याचा वेग आणि दिशा यांचा थोडाफार विचार आधी करावा लागतो. दुसरे हमखास या मधमाश्या दिसण्याचे ठिकाण म्हणजे पाणवठे. ओढे, नाले, विहीरी इथे या मधमाश्या पाण्याच्या कडेवर हमखास दिसतात, अश्या ठिकाणीसुद्धा त्यांची छायाचित्रे मिळू शकतात, पण फुलावरच्या मधमाशीची सर नक्कीच त्यांना येत नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
विंचवाला जिवंत जीवाष्म समजले जाते कारण गेल्या ४०० कोटी वर्षांमधे त्यांच्यामधे फार कमी बदल झाला आहे. आज जगात अंटार्क्टीका सारखे अगदी कमी प्रदेश सोडले तर विंचू सर्वत्र आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशा सहज सामावून जाणाऱ्या त्यांच्या जिवनपध्हती. त्यांच्या एवढे कमी अन्न कुठल्याच प्राण्याला लागत नाही. त्यांच्या बिळामधे त्यांच्या आयुष्याचा ते ९७% वेळ ते घालवतात. याच बरोबर त्यांना वर्षभर खायला नसले तरी ते जिवंत राहू शकतात एवढेच नव्हे तर त्यांना पाण्याची सुद्धा गरज लागत नाही. ही पाण्याची तहान त्यांनी खाल्लेल्या प्राण्याच्या शरीरातील द्रवपदार्थामुळे सहज भरून निघते. बरेचसे विंचू हे जीथे त्यांना त्यांचे खाणे अतिशय कमी असते आणि सहजा सहजी न मिळेल अश्या ठिकाणी रहातात. या विंचवांचे आयुष्यही त्याच्या आकाराच्या मानाने मोठे असते. यामुळे काही विंचवांचा वंशवृद्धीचा वेग अतिशय कमी असतो. या सगळ्या अडचणींवर मात करण्यात विंचवाचे शरीर त्यांना पुर्णपणे साथ देते आणि नवलाची बाब अशी की गेल्या कित्येक हजारो वर्षांत त्यांच्या शरीरात काही मोठा बदलही झालेला नाही आणि म्हणूनच हे विंचू प्रगत समजले जातात.
या विंचवांच्या रहायच्या जागा त्यांच्या जातीनुसार वेगवेगळ्या असू शकतात. काही विंचू झाडावर रहातात, काहींना खडक प्रिय असतात तर काही मऊ वाळून रहातात. सर्वसाधारणपणे विंचू हे त्यांनी खास खणलेल्या बिळात रहातात. विंचवाच्या जीवनक्रमातील सगळ्यात वैशिष्टपूर्ण कृती म्हणजे मिलनापूर्वीचे नर मादीचे नृत्य. मिलनासाठी उत्सुक असलेला नर विंचू काळजीपूर्वक मादीजवळ जातो आणि तिच्या नांग्या आपल्या नांग्यांमधे पकडतो. अशाप्रकारे मादीचे आक्रमणाचे शस्त्र नाकाम केल्यावर, नरमादीचे अनोखे मिलननृत्य सुरू होते. एकेमेकांच्या नांग्या एकमेकांत गुंतवून आणि शेपट्या उभारून मागे-पुढे सरकत त्यांचा नाच सुरू होतो. असा नाच काही तास केल्यावर विंचवाचे मिलन होते. विंचवाची अंडी मादीच्या शरीरातील पिशवीमध्येच उबवली जातात. विंचवाची मादी एकावेळेस एक अश्या अनेक पिल्लांना लागोपाठ जन्म देते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले आपल्या आईच्या पाठीवर जाउन बसतात. म्हणून तर विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर अशी म्हण पडली आहे. एकंदर पिल्लांची संख्या ही त्या त्या जातीनुसार बदलत जाते. पण १०५ पिल्लांचे लटांबर फिरवणाऱ्या मादीचीही नोंद झाली आहे. ही मादी अपल्या स्वत:च्या पिल्लांना त्यांच्या वासावरून बरोबर ओळखते आणि त्यांच्या पाठीवरून उतरलेले पिल्लू परत पाठीवर आणून बसवते. प्रसंगी नर आणि इतर माद्या यांच्याशीही तीची लढायची तयारी असते. ही पिल्ले सहसा पहिल्यांदा कात टाकेपर्यंत आईच्या पाठीवर रहातात आणि त्यानंतर ती स्वतंत्र त्यांचा जीव जगवतात. त्यांच्या वाढायच्या काळात नर ५ वेळा कात टाकतात तर माद्या ६ वेळा कात टाकतात. पहिल्या दोन कात टाकतानापर्यंतचा काळ त्यांच्या करता महत्वाचा असतो. एकदा का हा काळ त्यांनी पार केला की त्यांना फारसा धोका नसतो.
विंचवाचे आतापर्यंत मी छायाचित्रण बऱ्याच वेळेला केले आहे. दांडेलीच्या जंगलात तर एकाच नेचर ट्रेलमधे अनेक जातींचे विंचू बघितले होते. येऊरलासुद्धा पावसाळ्यात खुप वेळा त्यांचे दर्शन आणि छायाचित्रण झाले होते. मात्र आतापर्यंत पिल्लांना पाठीवर बाळगणारी "लेकूरवाळी आई" काही मला पहायला मिळाली नव्हती. या करता दरवेळेस जंगलात गेल्यावर न चुकता त्यांच्या संभाव्य जागांवर प्रत्येक दगड उलटून बघितला होता पण नशिबाने काही साथ दिली नव्हती. परवा मात्र येऊरला फुलपाखरांच्या "चिखलपानाच्या" छायाचित्रणासाठी गेलो असताना सुक्या ओढ्याच्या आसपास पहिलाच दगड उलटला आणि काय आश्चर्य !!! भारतातील सर्वात जहाल समजली जाणारी विंचवाची मादी छानपैकी आपल्या पाठीवर ५/६ पिल्लांना घेउन बसली होती. आमची चाहूल लागल्यावर काही पिल्ले हळूच पाठीवरून तिच्या पोटाखाली जाउन लपली. बराच वेळ थांबून आम्ही त्यांची बाहेर यायची बाट बघत बसलो. थोड्या वेळानंतर २/३ धिट पिल्ले हळूहळू आईच्या पाठीवर परत येऊन बसली आणि आपापसात खेळायला लागली. काही पिल्ले मात्र अजूनही आईच्या पोटाखालीच स्थिरावली होती. मनाजोगते त्यांचे छायाचित्रण झाल्यावर परत त्यांना खाली दगडाखाली आसरा दिला आणि तृप्त मनस्थितीत परत आलो ते गेल्या कित्येक वर्षांची स्वप्नपुर्ती झाल्याच्या आनंदातच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/