Thursday, March 5, 2009

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
विंचवाला जिवंत जीवाष्म समजले जाते कारण गेल्या ४०० कोटी वर्षांमधे त्यांच्यामधे फार कमी बदल झाला आहे. आज जगात अंटार्क्टीका सारखे अगदी कमी प्रदेश सोडले तर विंचू सर्वत्र आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशा सहज सामावून जाणाऱ्या त्यांच्या जिवनपध्हती. त्यांच्या एवढे कमी अन्न कुठल्याच प्राण्याला लागत नाही. त्यांच्या बिळामधे त्यांच्या आयुष्याचा ते ९७% वेळ ते घालवतात. याच बरोबर त्यांना वर्षभर खायला नसले तरी ते जिवंत राहू शकतात एवढेच नव्हे तर त्यांना पाण्याची सुद्धा गरज लागत नाही. ही पाण्याची तहान त्यांनी खाल्लेल्या प्राण्याच्या शरीरातील द्रवपदार्थामुळे सहज भरून निघते. बरेचसे विंचू हे जीथे त्यांना त्यांचे खाणे अतिशय कमी असते आणि सहजा सहजी न मिळेल अश्या ठिकाणी रहातात. या विंचवांचे आयुष्यही त्याच्या आकाराच्या मानाने मोठे असते. यामुळे काही विंचवांचा वंशवृद्धीचा वेग अतिशय कमी असतो. या सगळ्या अडचणींवर मात करण्यात विंचवाचे शरीर त्यांना पुर्णपणे साथ देते आणि नवलाची बाब अशी की गेल्या कित्येक हजारो वर्षांत त्यांच्या शरीरात काही मोठा बदलही झालेला नाही आणि म्हणूनच हे विंचू प्रगत समजले जातात.
या विंचवांच्या रहायच्या जागा त्यांच्या जातीनुसार वेगवेगळ्या असू शकतात. काही विंचू झाडावर रहातात, काहींना खडक प्रिय असतात तर काही मऊ वाळून रहातात. सर्वसाधारणपणे विंचू हे त्यांनी खास खणलेल्या बिळात रहातात. विंचवाच्या जीवनक्रमातील सगळ्यात वैशिष्टपूर्ण कृती म्हणजे मिलनापूर्वीचे नर मादीचे नृत्य. मिलनासाठी उत्सुक असलेला नर विंचू काळजीपूर्वक मादीजवळ जातो आणि तिच्या नांग्या आपल्या नांग्यांमधे पकडतो. अशाप्रकारे मादीचे आक्रमणाचे शस्त्र नाकाम केल्यावर, नरमादीचे अनोखे मिलननृत्य सुरू होते. एकेमेकांच्या नांग्या एकमेकांत गुंतवून आणि शेपट्या उभारून मागे-पुढे सरकत त्यांचा नाच सुरू होतो. असा नाच काही तास केल्यावर विंचवाचे मिलन होते. विंचवाची अंडी मादीच्या शरीरातील पिशवीमध्येच उबवली जातात. विंचवाची मादी एकावेळेस एक अश्या अनेक पिल्लांना लागोपाठ जन्म देते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले आपल्या आईच्या पाठीवर जाउन बसतात. म्हणून तर विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर अशी म्हण पडली आहे. एकंदर पिल्लांची संख्या ही त्या त्या जातीनुसार बदलत जाते. पण १०५ पिल्लांचे लटांबर फिरवणाऱ्या मादीचीही नोंद झाली आहे. ही मादी अपल्या स्वत:च्या पिल्लांना त्यांच्या वासावरून बरोबर ओळखते आणि त्यांच्या पाठीवरून उतरलेले पिल्लू परत पाठीवर आणून बसवते. प्रसंगी नर आणि इतर माद्या यांच्याशीही तीची लढायची तयारी असते. ही पिल्ले सहसा पहिल्यांदा कात टाकेपर्यंत आईच्या पाठीवर रहातात आणि त्यानंतर ती स्वतंत्र त्यांचा जीव जगवतात. त्यांच्या वाढायच्या काळात नर ५ वेळा कात टाकतात तर माद्या ६ वेळा कात टाकतात. पहिल्या दोन कात टाकतानापर्यंतचा काळ त्यांच्या करता महत्वाचा असतो. एकदा का हा काळ त्यांनी पार केला की त्यांना फारसा धोका नसतो.
विंचवाचे आतापर्यंत मी छायाचित्रण बऱ्याच वेळेला केले आहे. दांडेलीच्या जंगलात तर एकाच नेचर ट्रेलमधे अनेक जातींचे विंचू बघितले होते. येऊरलासुद्धा पावसाळ्यात खुप वेळा त्यांचे दर्शन आणि छायाचित्रण झाले होते. मात्र आतापर्यंत पिल्लांना पाठीवर बाळगणारी "लेकूरवाळी आई" काही मला पहायला मिळाली नव्हती. या करता दरवेळेस जंगलात गेल्यावर न चुकता त्यांच्या संभाव्य जागांवर प्रत्येक दगड उलटून बघितला होता पण नशिबाने काही साथ दिली नव्हती. परवा मात्र येऊरला फुलपाखरांच्या "चिखलपानाच्या" छायाचित्रणासाठी गेलो असताना सुक्या ओढ्याच्या आसपास पहिलाच दगड उलटला आणि काय आश्चर्य !!! भारतातील सर्वात जहाल समजली जाणारी विंचवाची मादी छानपैकी आपल्या पाठीवर ५/६ पिल्लांना घेउन बसली होती. आमची चाहूल लागल्यावर काही पिल्ले हळूच पाठीवरून तिच्या पोटाखाली जाउन लपली. बराच वेळ थांबून आम्ही त्यांची बाहेर यायची बाट बघत बसलो. थोड्या वेळानंतर २/३ धिट पिल्ले हळूहळू आईच्या पाठीवर परत येऊन बसली आणि आपापसात खेळायला लागली. काही पिल्ले मात्र अजूनही आईच्या पोटाखालीच स्थिरावली होती. मनाजोगते त्यांचे छायाचित्रण झाल्यावर परत त्यांना खाली दगडाखाली आसरा दिला आणि तृप्त मनस्थितीत परत आलो ते गेल्या कित्येक वर्षांची स्वप्नपुर्ती झाल्याच्या आनंदातच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment