Thursday, March 5, 2009

कामसू मधमाशी.
सगळ्याच किटकांचा आपल्या प्रत्यक्ष फायदा नसला तरी त्यांनी केलेल्या परागीभवनामुळे आपल्याला पिकांचे, फळांचे भरघोस उत्पादन मिळते. बदाम, सफरचंद, जरदाळू, कलींगड, खरबुज, आंबा, स्ट्रॉबेरी, मोसंबी, काकडी, वांगी, लाल भोपळा, मोहरी, सूर्यफुल अश्या अनेक पिकांच्या परागीभवनाकरता आणि अर्थात त्यनंतरच्या फलधारणेसाठी केवळ किटक आणि किटक यांचीच गरज असते. या परगीभवनात मधमाश्यांचा मोठा सहभाग असतो. मधमाश्या त्यांच्याकरता फुलांतील मध आणि त्यांच्या पिल्लांच्या वाढीसाठी फुलातील मकरंद गोळा करत असतात. या मधमाश्या जेंव्हा मधप्राशन करत असतात तेंव्हा आजुबाजुचे परागकण त्यांच्या शरीरावर चिकटतात आणि त्यांच्या पायावर असलेल्या खास "पराग परडीत" जमा होतात. मधमाशीची शरीररचना अशी काही निसर्गाने बनविली आहे की त्याचा जास्तीत जास्त फायदा फुलांना परागीभवनाकरता होतो. तिच्या शरीरावर आणि पायांवर असंख्य बारीकबारीक केस असतात. या केसांत अतिसुक्ष्म परागकण व्यवस्थीत चिकटून बसतात आणी जेंव्हा मधमाशी दुसऱ्या फुलाला भेट देते तेंव्हा तिथे या परागकणांचा संयोग होऊन परागीभवनाची शक्यता वाढते.
मधमाशीच्या पोळ्यामधे राणीमाशी, नर माश्या आणि कामकरी माश्या अशी वर्गवारी असते. राणीमाशीचे मुख्यकाम अंडी घालण्याचे असते. नर माश्या प्रजोत्पादनासाठी असतात तर कामकारी माश्या ह्या अप्रगत माद्या असतात. यांची संख्या सर्वात जास्त असून त्यांचे प्रमुख काम राणीची, पिल्लांची आणि पोळ्याची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे असे असते. याच माश्या बाहेर जाउन फुलांतील मध आणि मकरंद गोळा करण्याचे काम करतात. एका मोठ्या पोळ्यात अश्या ६०,००० पर्यंत अश्या कामकरी मधमाश्या असू शकतात. या सगळ्या माश्या पोळ्याच्या रक्षाणाकरता अथक परिश्रम करत असतात. मध आणि मकरंद गोळा करण्याचे कामसुद्धा खुप मेहेनतीचे आणि वेळखाउ असते. फुलांच्या ताटव्यापासून पोळ्यापर्यंतचे अंतर २/३ कि.मी. लांब सुद्धा असते. एकदा का एका कामकरी मधमाशीला फुलांचा ताटवा आणि त्यातला योग्य असा मधाचा साठा सापडतो तेंव्हा ती पोळ्यामधे परत येते आणि इतर माश्यांना ही उपयुक्त माहिती पुरवते. याकरता त्यांना त्यांच्या खास "नाचाची" भाषा वापरावी लागते. पोळ्यावर इंग्रजी आठच्या आकड्याप्रमाणे ती उडत रहाते आणि यावरून इतर माश्यांना त्या फुलांचे पोळ्यापासूनचे अंतर आणि दिशासुद्धा कळते आणि क्षणार्धात सगळी फौज सुसाट वेगाने नविन जागेवर मध गोळा करायला बाहेर पडते. कधी कधी कामकरी मधमाशी आपल्या तोंडातून दुसऱ्या मधमाशीला मध भरवून त्या मधाचे "सॅंपल"सुद्धा देतात. जंगलामधे किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्य कुठल्याप्रकारची फुले फुलली आहेत यावर बनणाऱ्या मधाचा प्रकार आणि चव ठरली जाते, म्हणजे जर त्या काळात जंगलात कारवीची फुले मोठ्या प्रमाणावर असतील तर बनणारा मध हा कारवीच्या गुणांनी बनलेला असतो. सध्या महाबळेश्वर आणि महाराष्टात इतरत्रही मोठ्या प्रमाणात मधुमक्षिकापालन केले जाते.
पुर्वी कर्नाळ्याच्या सुळक्यावर किंवा इतरही गड किल्ल्यांवर गिर्यारोहण करताना आग्या मधमाश्यांची मोठी मोठे पोळी दिसायची. त्यावेळेस त्या उठणार नाहीत, त्रास देणार नाहीत आणि आपल्या पाठी लागणार याची काळजी घेत होतो. आता मात्र छायाचित्रणासाठी या मधमाश्या जास्तीत जास्त कश्या दिसतील हाच विचार करत असतो. या माश्यांचे पोळे नेहेमी उंचावर असल्यामुळे सहसा त्यांचे जवळून छायाचित्रण शक्य होत नाही. मात्र एकेकट्या माश्या जेंव्हा फुलांवर घिरट्या घालताना दिसतात किंवा फुलांतील मध पिताना दिसतात तेंव्हा त्यांचे चांगले छायाचित्रण जमू शकते. कुठल्या फुलांमधे मध जास्त असतो आणि त्यावर या मधमाश्या आकर्षित होतात असे माहित असेल तर त्याठिकाणी जर आपण वाट बघत बसलो तर या मधमाश्यांची हमखास चांगली छायाचित्रे मिळतात. पण या मधमाश्यांचा उडण्याचा वेग आणि दिशा यांचा थोडाफार विचार आधी करावा लागतो. दुसरे हमखास या मधमाश्या दिसण्याचे ठिकाण म्हणजे पाणवठे. ओढे, नाले, विहीरी इथे या मधमाश्या पाण्याच्या कडेवर हमखास दिसतात, अश्या ठिकाणीसुद्धा त्यांची छायाचित्रे मिळू शकतात, पण फुलावरच्या मधमाशीची सर नक्कीच त्यांना येत नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment