Thursday, July 19, 2012


सुंदरबन तिवरांचे जंगल.....  

जंगल म्हणजे आपल्याला डोंगर दऱ्यांच्या कुशीत दडलेली घनदाट झाडी अपेक्षित असते पण सुंदरबनचे जंगल याला अपवाद आहे. सुंदरबन (बंगाली भाषेतील सुंदर जंगले) म्हणजे जगातील एक मोठा चमत्कार आहे. या जगातील सर्वात मोठ्या तिवरांच्या जंगालाची व्याप्ती आहे २६,००० चौ.कि.मी. जी जगातली एकमेव सलग तिवरांची जंगले आहेत. यातील दोन तृतीयांश भाग जरी बांगलादेशात असला तरी भारतातील सुंदरबन हे ९६३० चौ.कि.मी. आहे. इथल्या वैविध्यपुर्ण प्राणि, पक्षी आणि झाडांच्या जातींमुळे, लोकांचे जनजिवन आणि त्यांची संस्कृती, नदी आणि खाड्यांचा अनोखा मिलाफ यामुळे इथे लाखो देशी / विदेशी पर्यट्क आकर्षित होतात. जगातील सर्वाधिक म्हणजे २७४ भारतिय वाघांचा वावर इथल्या जंगलांमधे आहे. इथले वाघ नरभक्षक असल्याच्या गैरसमजुती आणि त्यांच्या खाऱ्या पाण्यातील वावरामुळे त्यांच्याबद्दल अजुनच आकर्षण वाढले आहे.

१९७३ मधे घोषित झालेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांमधे सुंदरबन हे प्रमुख होते. इथल्या महत्वाच्या जैवविविधतेमुळे आणि सतत बदल होणाऱ्या भौगोलीक बदलांमुळे १९८७ मध्ये IUCN  ने या जंगलाला “world heritage site” म्हणून घोषित केले तर १९८९ मध्ये  UNESCO  ने या जंगलाला “Biosphere Reserve” ची मान्यता दिली. यानंतरही ही जागा उत्तम पाणथळीची आहे म्हणून तीची गणना “Ramsar Site” मध्ये करण्यात आली. इथे गंगा नदीच्या खालचा भाग ज्याला हुगळी नदी म्हट्ले जाते तो बंगालच्या महासागरात मिळ्तो. यामुळे इथे अनेक खाड्या तयार झाल्या आहेत आणि भरती ओहोटेच्या वेळेस अगदी १५ फुटांपेक्षा जास्त पाणी इथे भरले किंवा ओसरले जाते.

सुंदरबन जरी तिवरांचे जगातील सर्वात मोठे जंगल असले तरी नक्कीच इकडच्या वाघांमुळे हे जास्त प्रसिद्ध आहे. भारतातील इतरत्र आढळणाऱ्या वाघांपेक्षा इकडचे बाघ आणि त्यांच्या रहाण्याच्या / जगण्याच्या सवयींमधे जमिन अस्मानाचा फरक आहे. दिवसभरात इथे दोन वेळा भरती आणि ओहोटी येते त्यामुळे जमिनीचा बराचसा भाग पाण्याखाली जातो आणि जेंव्हा पाणि ओसरते तेंव्हा तिथे दलदल असते. यामुळे इथेल्या वाघांना धावत जाउन शिकार करणे खुप कठिण असते. याचमुळे इथल्या वाघांना बऱ्याच वेळेला मासे आणि खेकडे मारून भूक भागवावी लागते. सगळीकडे पाणि असल्यामुळे इथले वाघ पट्टीचे पोहोणारे आहेत आणि बऱ्याच वेळेला जर का ते दिसले तर ते खाड्या पोहत पार करताना दिसतात. गोड्या पाण्याच्या अभावामुळे इथला वाघ साधारणत: खारे पाणी पिताना दिसतो. ज्या बाजूला गावे वसलेली आहेत त्या त्या ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडांच्या बाजूने जाळी लावलेली आहेत जेणेकरून वाघाला त्या बाजूने गावात शिरता येणार नाही. 


या खास प्रकारच्या अधिवासामुळे इथे वाघ दिसणे हे फार दूर्मिळ. वाघांचे सोडूनच द्या पण इतरही वन्य प्राणी इथे दिसणे म्हणजे नशिबाचीच बाब, कारण आपला सगळा प्रवास हा बोटीने होतो त्यामुळे फक्त किनाऱ्यावर जर का कोणी प्राणी आले तरच ते आपल्याला दिसणार. पण अर्थातच याच कारणामुळे अनेक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी आपल्याला सहज दिसू शकतात. सुंदरबनची खासियत म्हणजे इथे आपल्या सात वेगवेगळ्या जातीचे, रंगीबेरंगी खंड्या पक्षी दिसतात. या खंड्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बगळे, करकोचे, पाणकावळे हे खाडीच्या कडेला असलेल्या तिवरांच्या झाडांवर दिसतात. मधेच एखाद्या पाण्याच्या पट्ट्याच्या आत आपल्याला वेगवेगळी बदके मोठ्या थव्याने एकत्र पाण्यात खाणे शोधताना दिसतात. सगळीकडे तिवरांचे जंगल असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रकार अगदी सहज दिसतात. या तिवरांची एखाद्या भाल्याच्या फाळासारखी दिसणारी चिखलातून वर आलेली मुळे खरोखरच मजेशीर दिसतात. आपला नशिब जर का जोरावर असेल तर खाऱ्या पाण्यातली अजस्त्र सुसर आपल्याला काठावर विसावलेली आढळू शकते.
 
इथल्या आदिवासींचे जिवन अतिशय खडतर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना बोटीवर अवलंबून रहावे लागते. माणसांची आणी सामानाची ने-आण करण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नसतो. त्यांना उपजिवीकेसाठी मासेमारी, जंगलातून मध गोळा करणे, लाकूडफाटा जमवणे हीच काही मोजकी साधने आहेत. त्यातून त्यांना वाघापासून अतिशय सावध रहावे लागते. वन खात्याचे अधिकारीसुद्धा त्यांना अभयारण्य़ात चोरून मासेमारी केल्याबद्द्ल पकडतात. जंगलातले आणि नैसर्गिक धोके टळावे म्हणून सर्व गावकरी / आदिवासी “वन देवीची” पुजा करतात. नवलाची गोष्ट म्हणजे अगदी हिंदू आणि मुसलमान सुद्धा भिन्न धर्मिय असले तरी दर वेळेस बाहेर जातान या वन देवीची पुजा करतात. जंगलामधे, गावांमधे, प्रत्येक बेटावर या देवीचे देऊळ बांधलेले आहे.

आतापर्यंत अनेक जंगलांमधे पायी फिरलो आहे. मोठ्या मोठ्या राष्ट्रीय उद्यानांमधे जिप अथवा उघड्या वाहनाने फिरलो आहे. त्याठिकाणचे वन वैभव बघणे आणि छायाचित्रण करणे हे वेगळे कसब असते. पण सुंदरबन मधे कायम तुम्हाला बोटीने फिरावे लागते. इथे तसे वन्य प्राणी अगदी कमी दिसतात. वेगवेगळे पक्षी दिसले तरी त्यांचे छायाचित्रण शक्य होतेच असे नाही कारण एखाद्या जीपसारखी बोट पटकन बंद करता येत नाही. बोट चालता चालता छायाचित्रण करायचे म्हटले तर बोटीची थरथर छायाचित्रणात जाणवते त्याची खास काळजी घ्यावी लागते. असे असले तरी त्या बोटीतून नुसते फिरणे, त्या अनोख्या तिवरांच्या जंगलाचा निरिक्षण करणे आणि मग जमलेच तर छायाचित्रण करणे ही काही वेगळीच मजा आहे.

मी सुंदरबनच्या जंगलात खरतर तिकडच्या खाडीमधे दिवस दिवस प्राण्यांच्या मागावर फिरलो पण म्हणावे तसे काही त्यांचे दर्शन झाले नाही. पक्षी खुप दिसले पण त्यांचे छायाचित्रण काही होऊ शकले नाही. ३/४ दिवस सतत फिरून जेंव्हा परत निघणार त्या दिवशी आम्हाला वनखात्याची बोट दिसली. त्या बोटी मधे एक बोकड बांधला होता. आमच्या नावाड्याने सांगीतले की जवळपास कुठच्या तरी गावाच्या जवळ वाघ आला असणार म्हणून त्याला पकडण्यासाठी वनखात्याचे लोक आमिष म्हणून तो बोकड घेऊन चालले आहेत. त्या गावाच्या जवळ ते वन अधिकारी पिंजऱ्यामधे त्या बोकडाला पिंजऱ्यात बांधणार, त्याला खायला वाघ आला की त्याला पकडून लांब दूरवर सोडून देणार. हे आम्ही ऐकून आमच्या हॉटेल ला सामान न्यायला परत आलो तर बातमी कळली की आमच्या हॉटेलच्या बेटावरच, अगदी आमच्या दरवाज्यासमोरच एक भलामोठा नर वाघ अर्धा तास काठावर बसला होता आणि त्याला पकडण्यासाठीच ते वन अधिकारी आले होते. अर्थातच आम्हाला काही तो वाघ बघता आला नाही पण त्याच्या बद्दलच चर्चा करत करत आम्ही परतेच्या प्रवासाला लागलो.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment