Friday, May 8, 2009

उड्डाण "चक्र".
किटक आपण चिमुकले, नगण्य म्हणून संबोधत असलो तरी त्यांच्या जगण्याच्या क्षमता आपल्याला नेहेमीच अचंबीत करतात. आता फक्त चतूर आणि टाचण्यांचेच बघा ना !! एखाद्या जिमनॅस्ट प्रमाणे चपळ आणि सडसडीत असणारे ह्यांचे शरीर त्यांच्या सारखेच लवचीक आणि शक्तीमान असते. त्यांच्या डोळ्यात असलेल्या हजारो भिंगांमुळे त्यांची दृष्टी तर तिक्ष्ण असतेच पण त्यांच्या शरीरातील एकंदर स्नायुंच्या ६५% स्नायु हे फक्त उड्डाणाकरता खास असतात यावरून त्यांचे उडणे कीती उच्च क्षमतेचे असेल याचा आपल्याला अंदाज येतो. चतूर आणि टाचण्यांची बाल्यावस्था ही कित्येक महिन्यांची, वर्षांची असते आणि ती पाण्याखाली जगली जाते तर त्यांची प्रौढ अवस्था केवळ काही आठवड्यांची असते आणि ती जमिनीवर असते. यातीलसुद्धा बराचसा काळ ते हवेत उडण्यातच घालवतात. या उडण्याचा मुख्य उद्देश शिकार पकडण्याचा असू शकतो किंवा त्यांची हद्द सांभाळण्यासाठी, मादी मिळवण्यासाठी असू शकतो.
चतूर आणि टाचण्यांच्या अनेच जाती ह्या हद्दप्रिय असतात. त्यांना त्यांची हद्द राखायला, सांभाळायला अतिशय आवडते आणि कोणी इतर नर जर त्यांच्या हद्दीत आला तर तर त्याला ते पळवून लावतात. यासाठी ते एकतर त्यांच्या हद्दीत पहारा केल्यासारखी गस्त घालतात किंवा उंच झाडावर, फांदीवर बसून आपल्या हद्दीत कोणी येत तर नाही ना याची काळजी घेतात. मात्र जर ला एखादी मादी त्याच्या हद्दीत आली तर मात्र तीला गटवण्यासाठी त्याची धावाधाव होते. नर उडता उडताच खात्री करून घेतो की ती मादी त्याच्याच जातीची आहे आणि मिलनास तयार आहे. मादीसुद्धा आजूबाजूला उडून खात्री करून घेते की हा नर तीच्या योग्य आहे की नाही आणि त्याची हद्द ही अंडी घालण्यासाठी उपयोगी आणि उचित आहे की नाही. जर का दोघांना या सर्व अटी योग्य वाटल्या तर ते मिलनासाठी तयार होतात.
यांच्या मिलनाची अजब तर्हा असते. नर मादीचे डोके अथवा धड आपल्या लांबलचक शेपटीच्या टोकाने गच्च पकडतो. ह्या स्थितीत तो तीला घेउन उडू सुद्धा शकतो. काही वेळानंतर ते एका जागेवर स्थीर बसतात. यानंतर नर आपली पकड अजून घट्ट करून मादी सरकणार नाही याची खात्री करून घेतो. यानंतर मादी आपली लांबलचक शेपटी पुर्ण गोलाकार वळवून नराच्या धडाच्या आणि शेपटीच्या सांध्यावर आणून चिकटवते. यामुळे तीच्या अंड्यांचे या नराकडून फलन होण्यासाठी मदत होणार असते. यावेळी जर त्यांची शरीर आकृती बघितली तर ती पुर्ण गोलाकार असते आणि म्हणूनच त्याला चक्री मिलन असे म्हणतात. या वेळेस आणि त्याच स्थितीत नर मादीला घेऊन उडूसुद्धा शकतो आणि नविन जागी या चक्राच्याच अवस्थेत बसतो. यामुळे या उड्डाणाला "चक्री उड्डाण" असे म्हणतात. यावेळी नर खात्री करून घेत असतो की त्याच्याकडून त्या मादीच्या अंड्यांचे फलन पुर्ण झाले आहे. जोपर्यंत मादी पाण्यात अंडी घालत नाही तो पर्यंत काही जातीचे नर मादीला सोडत नाहीत आणि तिचे डोके आपल्या शेपटीच्या टोकाने घट्ट धरून ठेवतात.
चतूर आणि टाचण्यांची जर अशी छायाचित्रे हवी असतील तर खचीतच पाण्याच्या जवळ आपल्याला वाट बघत बसावे लागेल. नदी, नाले, तलाव, डबकी, धबधबे, खाडीच्या पाणथळ जागा अश्या अनेल ठिकाणी आपल्याला हे चतूर आणि टाचण्या दिसू शकतात. यांचा विणीचा हंगाम एकतर पावसाळ्यानंतर लगेच किंवा मे महिन्यामधे पावसाळ्याच्या थोड्या आधी असतो. अर्थातच यांच्या उडण्याचा वेग भन्नाट असल्यामुळे यांची मनाजोगती छायाचित्रे मिळवताना खुप वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे हे प्रचंड हद्दप्रिय असल्यामुळे आपण यांचे छायाचित्र काढायला गेलो आणि बटन दाबणार याच वेळात जर का दुसरा आगंतुक नर त्यांना आसपास दिसला तर त्याला पळवायला ते त्याच्या मागे जातात आणि मग परत काही आपल्याला त्यांचे छायाचित्र मिळत नाही. जर का एखादी मिलन जोडी आपल्याला दिसली तर ती बराच वेळ एकाच जागी शांत बसलेली असते त्यामुळे त्यांची छायाचित्रे सहज मिळतात. अर्थात त्यावेळी त्यांच्या जास्त जवळ न जाता लांबूनच छायाचित्रे काढणे नेहेमीच उचीत ठरते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment