Sunday, February 17, 2013


लुकलुकणारे काजवे...  

सध्या शहरांच्या आसपास हे काजवे दिसत नसले तरी अजुनही गावांमधे, घनदाट जंगलांत किंवा गड किल्ल्यांवर पावसाळ्यातील संध्याकाळे हे लुकलुकणारे काजवे मधेच उडताना दिसतात. कधीतरी आपण जर का एखाद्या किल्ल्यावर रात्री मुक्काम केला असेल किंवा एखाद्या जंगलात रात्री मचाणावर रात्र काढली असेल तर कधीतरी मधेच एखादे झाड या काजव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते आणि मंद वाऱ्याबरोबर डोलूसुद्धा लागते आणि क्षणार्धात तो प्रकाश परत मावळून जातो.

इंग्रजी मधे या किटकांना “ग्लो वर्म” किंवा “फायर फ्लाय” असे म्हणतात. पण खरेतर हे वर्म सुद्धा नाहित आणि फ्लाय किंवा माश्या सुद्धा नाहित. कोलिऑप्टेरा गणाच्या बिटल्स किंवा ढालकिड्यांच्या (लॅपिरिडी) कुळात यांचा समावेश होतो. हे किटक अर्थातच निशाचर आहेत आणि आणि त्यांच्या सुमारे २००० जाती असून त्यात सतत नविन उपजातींची भर पडत असते. जगभरात सगळ्या देशांमधे काजवे लुकलुकताना दिसतात याला फक्त अंटार्क्टिका खंडाचा अपवाद आहे. बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजव्याच्या नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात. मात्र त्यांच्या माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात. त्यांच्या आकार मात्र नरापेक्षा बराच मोठा असतो. प्रकाश देणारे अवयव नर काजव्यात उदराच्या खालील बाजूस सहाव्या व सातव्या खंडांत तर, मादीत त्यामागील खंडांत असतात.

काजव्यांचा प्रकाश सहसा पांढरा, पिवळा, हिरवा किंवा तांबडा असतो. पोटामधल्या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरीन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज विकराच्या सान्निध्यात ऑक्सिजनाबरोबर संयोग पावते आणि प्रकाशनिर्मिती होते. सामान्यपणे काजव्यांचा प्रकाश मधूनमधून थांबणारा असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने प्रकाशतात. काही जातीच्या माद्या मात्र सतत काही सेकंद प्रकाशतात. प्रजनन काळात नर आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो. नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटल्यास ती प्रकाशून प्रतिसाद देते आणि मीलन घडून येते. मात्र याचाच फायदा काही इतर जातीच्या काजव्याच्या माद्या घेतात. त्या प्रकाशून नराला प्रतिसाद देतात पण तो नर मादीच्या जवळ आल्यावर चक्क त्याला खाउन टाकतात. मिलनाचा हंगाम संपला की नर मरतात. मादी सामान्यपणे दमट जागी अंडी घालते.


अंड्यातून बाहेर पडलेली काजव्याची अळी आणि पंख फुटलेला प्रौढ काजवा यांची जीवनशैली परस्परविरूद्ध पण परस्परपुरक असते. प्रौढ काजव्याला सगळे लक्ष पुनरूत्पादनावर केंद्रित यावे, अन्न शोधण्यात त्याचा वेळ आणि शक्ती वाया जाऊ नये म्हणून अळीरूपातला काजवा खा खा खाऊन शरीरात चरबीचा साठा करून ठेवतो. या अळीचा आहार मात्र स्पेशल असतो. गोगलगाय व तत्सम प्राण्यांखेरीज इतर कशालाही ही अळी तोंड लावत नाही.

गोगलगायींची हालचाल वाढते ती रात्रीच्या अंधारात त्यामुळे दिवसभर झाडाझुडपांच्या, पालापाचोळ्याच्या आसऱ्याने पडून असणारी काजव्याची अळी रात्रीच गोगालगायीच्या मागावर निघते. या अळीच्या शेपटीमध्ये ल्युसीफेरीन या द्रव्यामुळे प्रकाश उजळतो. पण या दिव्याचा भक्ष्य शोधण्यासाठी तीला काहीच उपयोग नसतो कारण आपल्या काळ्या, गुळगुळीत डोळ्यांनी तिला काहीच दिसत नाही. फक्त समोरच्या उजेडातील कमीजास्तपणा आणि अंधूक हालचाल जाणवते. दृष्टीतील ही जाणीव भरून काढण्यासाठीच निसर्गाने काजव्याच्या अळीला जाडसर चाचपण्या (ऍटेना) दिल्या आहेत. शिवाय या अळीच्या तोंडाभोवती अतीसंवेदनाशील अश्या सहा स्पर्शीकाही असतात. त्यांच्या मदतीने अळी आपले सावज - गोगलगाय शोधते.

सावज सापडल्यावर अळी आपल्या विळ्यासारख्या धारदार जबड्याने गोगलगायीला दंश करते. हा दंश करायला तिला एक सेकंदाहूनही कमी वेळ लागतो. पण या अल्प वेळात ती गोगलगायीच्या शरीरात विषारी द्राव सोडते. विषाचा असर होईपर्यंत अळी अनेकदा गोगलगायीच्या शंखावर घट्ट बसून रहाते. गोगलगायीची हालचाल मंदावली की अर्धमेल्या गोगलगायीवर ताव मारते. काजव्याच्या अळीला आपल्या शरीरातील दिव्याचा काही उपयोग नसला तरी प्रौढ काजव्यांना मादीला आकर्षीत करून घेण्यासाठी हाच दिवा उपयोगी पडतो. या प्रकाशनिर्मितीत कोणतीही उर्जा उत्सर्जीत होत नसल्याने यात उष्णता वा ऊब ही नसते. त्यामुळे याचे वर्णन थंड उजेडाचा दिवा असेही करता येईल.

लुकलुकणारे हे काजवे जरी दिसायला छान दिसत असले तरी त्यांचे छायाचित्रण तेवढेच कठिण असते. जवळपास सर्वच काजवे निशाचर असल्यामुळे त्यांचा वावर रात्रीच्या काळोखातच असतो. यामुळे त्यांच्या छायाचित्रणासाठी फ्लॅशसुद्धा वापरता येत नाही. नर काजवे सतत उडत असल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ जरी पळत सुटलो तरी ते त्या वेळी प्रकाशमान होतीलच असे नाही. ज्यावेळी ते प्रकाशमान असतात त्यावेळी छायाचित्रण केले तर ते त्यावेळी हालचाल करून पुढे पळतात. त्यामुळे प्रकाशमान असलेल्या काजव्याचे छायाचित्र मिळवणे मोठे दिव्याचे काम असते.  नुकताच मी ठाणे जिल्यातील जव्हारच्या आसपासच्या जंगलात फिरत असताना मला बरेच नर काजवे झाडावर चमचमताना दिसले पण ते एवढे वेगाने उडत होते की त्यांच्यामागे पळूनसुद्धा मला त्यांची छायाचित्रे काही मिळाली नाहित. मात्र जंगलामधे मला एका ठिकाणी मला एक काजव्याची मादी सापडली. दिसायला ती अगदी एखाद्या पतंगाच्या अळीसारखी दिसत होती. मात्र माझ्यासाठी महत्वाचे होते की तिचे पोट हिरव्या रंगाच्या मंद प्रकाशाने चमकत होते आणि तो प्रकाशसुद्धा लुकलुकणारा नव्हता आणि सतत तेवत होता. आता दुसरे महत्वाचे काम म्हणजे तो मंद प्रकाश छायाचित्रात पकडणे, याकरता कॅमेरा ट्रायपॉड्वर ठेवून चक्क ३० सेकंदाचे लांबलचक एक्स्पोजर दिल्यानंतर तो हिरवा प्रकाश मला छायाचित्रात पकडता आला.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

बेडकांचे डरॉव डरॉव...  

कार्टून मधे विनोदी अवतारात असणारा आणि क्रेझी फ्रॉग गाण्यातला बेडूक आपल्याला परिचीत असला तरी प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी काहीच माहिती नसते. काही वर्षांपुर्वि भारतातून पुर्वेकडील देशांमधे बेडकांची निर्यात होत असे. त्यांचे पाय हे मांसल असल्यामुळे खाण्यासाठी त्यांना मोठी मागणी होती. अर्थातच आपल्याकडे शिकारीवर धरबंध नसल्यामुळे त्या बेडकांची बेसुमार कत्तल झाली आणि त्याचा परिणाम भात आणि इतर शेतीवर झाला. यानंतर बेडकांच्या शिकारीवर आणि निर्यातीवर बंदी आली तरीसुद्धा या बेडकांबाबत आपल्याला इतर माहिती काहीच नाही आणि त्यांच्यावर अभ्याससुद्धा झाला नाही.

पण निसर्गचकात बेडकासारख्या उभयचर प्राण्यांचे स्थान फार महत्वाचे आहे. कारण पाण्यात निर्माण झालेल्या जिवसृषटीने काठावर उडी मारायचे धाडस पहिल्यांदा केले ते बेडकासारख्या उभयचर प्राण्यांच्या रूपाने. थंड रक्ताचे हे कणावान प्राणी जमिनीवर आले खरे, पण मुलभूत मर्यादांमुळे जमिनीवर स्थिरावू शकले नाहित. उभयचर वर्गात बेडकांखेरीज सिसिलीयन, सॅलॅमेंडर असे प्राणी आढळत असले तरी दादागिरी चालते ती बेडकांचीच. उभयचरांच्या एकूण प्रजातींपैकी नव्वद टक्के प्रजाती या बेडकांच्याच आहेत. भारतात जे २३५ प्रजातींचे उभयचर नोंदविण्यात आले आहेत, त्यापैकी सुमारे २०० प्रजाती या बेडकांच्या आहेत. जमिनीत आणि पाण्यात दोन्हीकडे वावरणारे उभयचर प्राणी कल्ले, फुफ्फुस आणि त्वचा या सगळ्यांच्याद्वारे गरजेनुसार श्वसन करतात. बेडकांच्या त्वचेची जडणघडणच अशी असते की, त्यांच्या त्वचेमधून शरीरातील पाण्याचे बाष्पिभवन झपाटयाने होते म्हणून बेडूक नेहेमीच भरपूर आर्द्र हवामानाच्या ओलसर वातावरणात वावरतात. बेडकांना सभोवतालच्या परिसराप्रमाणे शरीराचा रंग बदलण्याची कला अवगत असते. मात्र बेडकांनी जमिनीवर कितीही उडया मारल्या तरी त्यांना प्रजननासाठी पाण्यातच जावे लागते. 

झाडाझुडुपांवर राहण्याऱ्या वृक्षवासी बेडकांचा एक खास वर्गच आहे. या वृक्षवासी बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट, थाळीसारखा झालेला असतो. त्यामुळे त्यांना झाडावर चढणे सोपे जाते. या बेडकांच्या डोळ्यातील बाहुल्या आकारने आडव्या असतात. तसेच या बेडकांच्या पायावर आतील बाजूस भडक रंगाचे पटटे असतात जे बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. या भडक रंगाचा वापर करून बेडूक आपल्या शत्रुला चकवतात. आणि स्वत:चा बचाव करतात. झाडावरच्या बेडकांमध्ये रहाकोफोरस या कुळातील बेडकांच्या पायाचे पडदे थोडे मोठे असतात, ज्यांच्या मदतीने ते हवेत तरंगू शकतात. त्यामुळे त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी जमिनीवर उतरावे लागत नाही. एकुणच झाडावरच्या बेडकांची शक्ती लांब उडया मारण्यातच सामावलेली असते. पश्चिमघाटातील जैवविवीधता संपन्न करण्यात उभयचरांना विशेषत: बेडकांचा सहभाग फार मोठा आहे. झाडावरचे हे बेडूक इतर बेडकांप्रमाणेच पाण्यात अंडी घालत नाहीत तर पाण्यालगतच्या वनस्पतींच्या पानांवर अंडी घालतात. या अंडयांचा ओलसरपणा टिकावा म्हणून मादी त्यावर वारंवार मुत्रविसर्जन करते. अंडी पक्व झाल्यावर, त्यातून बेडकाची पिल्ले पडतात ती सरळ खालच्या पाण्यामध्ये. प्रौढ झाल्यावर मात्र हे बेडूकराव झाडावरच बस्तान बसवतात. सह्याद्रीतील किंवा एकंदरच पश्चिमघाटातील जंगलांचा नाश यामुळे या बेडकांच्या अनेक जाती अस्तंगत झाल्या आहेत किंवा त्यांची सापडण्याची ठिकाणे अतिशय मर्यादित झाली आहेत. यामुळेच या बेडकांच्या कित्येक जाती गेल्या अनेक वर्षात किंवा शतकातसुद्धा कोणाला दिसलेल्या नाहित. याच कारणामुळे डॉ. एस. डी. बिजू यांनी “Lost Amphibians of India” ही मोहिम काढली आणि भारतातील अनेक जंगलांचे कानाकोपरे शोधून ज्या जाती अनेक वर्षात दिसल्या नव्हत्या त्या परत शोधून काढल्या.

याच मोहिमेच्या अंतर्गत मी गेल्या वर्षी महाराष्ट्रातील भिमाशंकर अभयारण्य आणि फणसाडच्या अभयारण्याला डॉ. एस. डी. बिजू आणि त्याच्या इतर सभासदांसोबत भेट दिली. पावसाळा संपला असला तरी आम्हाला त्यावेळी बेडकांच्या अनेक जाती दिसल्या आणि त्यांचे छायाचित्रण करता आले. पण एरवी पावसाळ्यात संध्याकाळी जंगलात फेरफटका मारला तर आपल्याला बेडकांचे ओरडणे ऐकू येते पण सहसा ते आपल्याला दिसत मात्र नाहित. दिवसा जे बेडूक दिसतात ते त्यावेळे बिलकूल आवाज करत नाहित. याच कारणाकरता मी कित्येक दिवस आवाज काढणाऱ्या बेडकाचे छायाचित्र मिळायची वाट बघत होतो. भिमाशंकर आणि फणसाडच्या अभयारण्यात प्रजननाचा काळ उलटला असल्यामुळे “ओरडणारे” बेडूक काही सापडले नाहित. या वर्षी पावसाळा सुरू झाल्यावर माथेरानच्या जंगलांमधे त्यांना शोधण्यासाठी खास रात्री तिथे जंगलामधे फेरफटका मारला पण याही वेळेस काही मला ओरडणाऱ्या बेडकांची छायाचित्रे मिळाली नाहित.

नुकताच ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभोसा गावात तिथल्या धबधब्याला भेट दिली होती. संध्याकाळपर्यंत आम्ही दाभोसा धबधब्याची छायाचित्रे काढली आणि रात्री जेवून परत येताना आमच्या “नेचर ट्रेल्स” रिसॉर्ट्च्या स्विमिंग पुलच्या मागच्या जंगलात अनेक बेडकांचा आवाज ऐकला. मी त्वरीत जाउन टॉर्चच्या प्रकाशात आवाजाच्या दिशेने त्या बेडकाला शोधायला लागलो. आवाज भलताच मोठा असल्यामुळे मी मोठा बेडूक असेल असे समजत होतो पण तो आवाज करणारा बेडूक काही दिसत नव्हता. आवाज तर येत होता पण तो मोठा बेडूक काही जाम दिसत नव्हता. मी परत अगदी जमिनीवर खालच्या भागात शोधायला लागलो तर मला जेमतेम एका इंचापेक्षा लहान असलेला पिवळसर तपकिरी बेडूक दिसला. आख्या शरीराला फुगवून, त्यात हवा जमवून तो ती गळ्याखालच्या फुग्यातून बाहेर टाकत होता आणो ओरडत होता. इतका चिमुकला जीव एवढा मोठठा आवाज काढत असेल हेच पटत नव्हते पण त्याच बेडकाच्या मागे दुसरा नर त्याला आवाज देउन, दोघांची जुगलबंदी सुरू होती. Ornate Narrow mouthed Frog असे या बारक्याशा बेडकाचे नाव आहे आणि ज्या छायाचित्राची मी गेले कित्येक दिवस वाट बघत होतो ते मला अगदी अचानकच आणि सहज घेता आले.



युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

फणसाडचे अभयारण्य....  

आज मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या जवळसुद्धा कर्नाळा, तुंगारेश्वर अशी सुंदर अभयारण्य आहेत. याठिकाणी अगदी एका दिवसात जाता येते. मुंबईपासून अजुन थोड्या लांब अंतरावरचे अभयारण्य आहे फणसाडचे. फणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्‍यात आहे. अनेक पर्यटक काशीद, रेवदंडा किनाऱ्यापर्यंत येतात; किंवा पुढे मुरूड जंजीऱ्याला जातात, पण त्यांना फणसाडचे जंगल मात्र माहित नसते. पर्यटकांपासून दूर असल्यानेच ते अद्याप सुरक्षित आहे, असे म्हणायलाही हरकत नाही. फणसाड हे स्वातंत्र्यापूर्वी जंजिरा संस्थानाचे नबाब सिद्दी यांचे खासगी क्षेत्र होते, त्यावेळेस या जंगलाला केसोलीचे जंगल म्हणून ओळखायचे. त्या वेळी शिकारीसाठी नबाबांनी जंगलामध्ये जांभा दगडाचे वर्तुळाकार ओटे बनविले होते. स्थानिक भाषेत त्यांनी "बारी' असे म्हणतात. १९४८ मध्ये संस्थान खालसा झाल्यानंतर जंगलतोड आणि अवैध शिकारींमुळे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली. कोळसानिर्मिती आणि बॉक्‍साईट उत्खननामुळे येथील समृद्ध जमिनीचा र्र्हास होऊ लागला. त्यामुळे वन खात्याने या क्षेत्राला अभयारण्य घोषित केले.

फणसाडच्या अभयारण्यात बिबळया, कोल्हा, सांबर, भेकर, रानडुक्कर, पिसोरी, ससे, साळींदर आणि महाराष्ट्राची शान व राज्यप्राणी असणारी मोठी खार किंवा शेकरू आढळते. इथे सुमारे २०० हून अधिक जातीचे रंगीबेरंगी पक्षी आढळतात. सध्या तर इथे आख्या जगात आणि भारतात नामशेष होणारी गिधाडेसुद्धा मोठ्या संख्येनी दिसत आहेत. पक्ष्यांबरोबर अनेक आकर्षक रंगाची फुलपाखरे, चतूर, टाचण्या पाण्याजवळ बागडत असतात. अनेक जातीचे विषारी, बिनविषारी साप, सरडे, विंचू, कोळी इथे मुबलक प्रमाणात दिसतात. या जंगलात पानझडी, शुष्क वने आणि निम्नसदाहरित आणि सदाहरित वने आढळून येतात. समुद्राजवळ असूनही दाट झाडीमुळे येथील तापमान दमट नाही. वृक्षप्रेमींसाठी हे अभयारण्य सर्व ऋतूंत आल्हाददायक आहे. पिंपळ, साग, आवळा, सप्तपर्णी, शिसव, कदंब, कळम, अंजनी, सावर, शिवण, करंज, सीता-अशोक, सुरंगी, लोखंडी, खवस असे सुमारे ७००हून अधिक वृक्ष येथे आढळून येतात. काही ठिकाणी एक झाड सदाहरित आणि त्याच्या शेजारी पाणझडीचे झाड दिसले, तर आश्‍चर्य वाटते. गारंबीची महाकाय वेल येथे असून, त्या वेलीला चार फूट लांबीच्या शेंगा लागलेल्या आढळून येतात. याशिवाय अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीही येथे आढळतात.

येथील जंगलात पाणी मुरण्याचे आणि साठून राहण्याचे प्रमाणही अजून बऱ्यापैकी आहे. इकडे पाणवठय़ांचा गाणअसा उल्लेख केला जातो. फणसाड गाण, चिखलगाण, धरणगाण असे इथले प्रमुख पाणवठे आहेत. या पाणवठ्याच्या आजुबाजुला आपल्याल वन्यजिवन अगदी सहज बघायला आणि छायाचित्रणासाठी मिळू शकते. मात्र इथे फिरायचे असेल तर तो सच्चा निसर्गेप्रेमी असायला हवा, कारण इथे रहायच्या / जेवायच्या अगदी प्राथमीक सोयी आहेत. या इथे वनविभागाने सुपेगाव येथील परिसरात राहाण्यासाठी तंबूंची  व्यवस्था केलेली आहे. ठाणे, अलिबाग आदी ठिकाणच्या वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्याचे आरक्षण होऊ शकते. जेवणाची सोय सुपे गावातील महिलांच्या बचत गटा मार्फत केली जाते. निसर्गप्रेमींसाठी फणसाडचे जंगल हे सगळ्या हंगामात उत्तम ठरते. फणसाडच्या जंगलात गेलो आणि नविन काही बघितले नाही असे होतच नाही. अगदी भर उन्हाळ्यात गेलो तरी चिखल गाणीच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे दिसतात तर फणसाडच्या गाणीवर अगदी शेकरू सुद्धा भल्या पहाटे सहज दिसते. पावसाळ्यात जर का आपण फणसाडच्या जंगलात गेलो तर असंख्य प्रकारचे किटक, फुलपाखरे, त्यांच्या अळ्या, मोठे मोठे पतंग, ढालकिडे, कोळी, सापांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला सहज दिसतात. अर्थात यावेळी आपल्याला चिखलात बरीच पायपिट करावी लागते आणि ठिकठिकाणी जळवांचा त्रास होऊ शकतो.

नुकताच मी डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला फणसाडच्या जंगालाला भेट दिली. सोबत भारतातले प्रसिद्ध बेडकांचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. बिजू होते. अर्थातच आमचा सगळ्यांचा भर हा वेगगेवळ्या प्रकारचे बेडूक शोधण्यावर होता. डॉ. बिजू, त्यांचे विद्यार्थी आणि आम्ही चिखलगाणीच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या भागात बेडकांची शोधाशोध करत होतो. याच ठिकाणी मी कॉमन मॅप जातीचे फुलपाखरू कित्येक वर्षांपुर्वी बघितले होते, पण त्याचे छायाचित्र माझ्याकडे नव्हते. त्यानंतरच्या फणसाडच्या प्रत्येक खेपेमधे मी त्या फुलपाखराला शोधत होतो पण दरवेळेस त्याने मला हुलकावणी दिली होती. एकावेळी तर ते फुलपाखरू मला दिसले पण ते जमिनीपासून २०/२५ फुटांवर एका फांदीवर पानाखाली बसून राहिले. ते तिथे दिसत असून सुद्धा मला त्याचे छायाचित्र काही मिळू शकले नव्हते. यावेळी मात्र आम्ही तिथे बेडूक शोधत असताना मला याच फुलपाखरांची एक जोडी तिथे अलगद येउन जमिनीवर उतरत असतना दिसली. मी धावपळ करून कॅमेरा आणला आणि त्यांचे छायाचित्रण सुरू केले. ज्या फुलपाखराला मी तिथे अनेक वर्षे शोधत असताना ते मला मिळाले नव्हते पण अचानक ध्यानीमनी नसताना मला ते तिथेच सापडले आणि त्याने मला त्याची छायाचित्रेसुद्धा घेउ दिली.

याच फणसाडच्या जंगलात मला गारंबीचे वेल दिसले की ज्यांच्यावर अगदी ४/५ फुटांच्या लांब हिरव्यागार शेंगा लटकत होत्या. फेब्रुवारी / मार्चच्या सुमारास गेलो तर तिथल्या सगळ्या माळरानांवर अंजन फुललेला असतो आणि त्याच्या सगळ्या फांद्या ह्या कोनफळी, जांभळ्या रंगाच्या नाजुक फुलांनी भरून गेलेल्या असतात. एवढेच नव्हे तर त्या झाडाखाली त्या फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या पडून तिथली सगळी जमिनच जांभळी झालेली असते. फणसाडच्या जंगलात पक्षिनिरेक्षण सुद्धा उत्तम होते. मागे मला एका रात्री मी रातव्यांच्या (Nightjar) मागावर होतो तेंव्हा मला रातवा तर दिसलाच पण तीच्या पोटाखाली तीची २ अगदी लहान पिल्ले सुद्धा दिसली. सध्या फक्त दक्षिणेत दिसणारे श्रीलंकन फ्रॉगमाउथ तिथे माळावर दिसत असल्याची बातमी आहे. त्यामुळे अर्थीतच पुढ्च्या भेटीमधे या दुर्मिळ पक्ष्यांना शोधण्याचा अजेंडा आहे.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

Saturday, February 16, 2013

अवाढव्य ऍट्लास मॉथ...  

 साधारणत: २२ वर्षांपुर्वी एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले. आधी मला ते खोटे आणि प्लॅस्टीकचे वाटले कारण त्याचा आकार चक्क एक फुटाएवढा मोठा होता. थोडे अधिक जवळ जाउन बारकाईने बघीतले तेव्हा जाणवले की ते एक फुलपाखरू नसून ती दोन फुलपाखरांची मिलन जोडी होती आणि हळूहळू हलतही होती. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण जे बघत होतो ते नक्कीच सत्य होते. आम्ही हळूच त्या जोडीला सॅकमधून घरी आणले आणि एका मोठ्या काचेच्या रिकाम्या फिश टॅंकमधे ठेवले. आता ते फुलपाखरू कुठले आहे ते ओळखण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यावेळी भारतीय फुलपाखरांवर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटचाही प्रसार आपल्याकडे झाला नव्हता. बऱ्याच शोधाअंती बी.एन.एच.एस चे श्री. आयझॅक किहीमकर यांचे तज्ञ म्हणून नाव कळले आणि त्यांना फोन केला. फोनवरच्या त्या माझ्या फुलपाखराच्या वर्णनावरूनच ते प्रचंड उत्साहीत झाले आणि त्यांनी सांगीतले की ते फुलपाखरू नसून ऍटलास मॉथ हा पतंग आहे आणि तो जगातला सर्वात मोठा पतंग म्हणून गणला जातो. याशीवाय मुंबईमधे बऱ्याच वर्षांच्या काळानंतर तो परत दिसला आहे. त्वरीत स्वत: आयझॅक किहीमकर आणि त्यांचे मित्र सुधीर सप्रे माझ्याकडे आले आणि त्यांनी छायाचित्रे घेतली. मधल्या काळात नर पतंग मरून गेला आणि  मादी पतंगाने गुलबट रंगाची ज्वारीच्या दाण्याएवढी १०० एक अंडी घातली. या पतंगांना तोंडाचे अवयवच नसतात आणि प्रौढ अवस्थे मधे फक्त जोडीदार मिळवून मिलन घडल्यावत पुढचा वंश वाढवणे हे एकच काम त्यांना असते. त्यामुळे नर ७/८ दिवसात मरतात तर मादी पुढे अंडी घालून  लगेच मरते. या काळात अळी असतानी त्यांनी खाल्लेले अन्न त्यांच्या शरीरार चरबीच्या स्वरूपात साठवलेले असते त्यावर त्यांची गुजराण होते. या प्रकारानंतर माझा फुलपाखरांचा अभ्यास सुरू झाला. पक्षीनिरीक्षणाबरोबर हा अजुनच एक वेगळा आनंद होता. अगदी आपल्या घराच्या आसपास, बागांमधे अनेक जातींची, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात पण आपल्याला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नसते. ही ईवलीशी फुलपाखरे हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, काही विषारी फुलपाखरे असतात आणि त्यांची नक्कल करणारी बिनविषारी फुलपाखरेसुद्धा असतात हे सर्व काही नविन होते. अर्थात भारतीय जातींवर पुस्तके नसल्यामुळे अनेक परदेशी पुस्तकांवरूनच माहिती मिळवली आणि ज्या जाती त्यांच्याकडी आणि आपल्याकडेसुद्धा दिसतात त्यांची थोडीफार ओळख झाली. याच प्रयत्नातून, अभ्यासातून फुलपाखरांवर "छान किती दिसते" हे १९९४ मधे पुस्तक लिहीले. बहुतेक ते मराठीत फुलपाखरांवर खास असलेले पहिलेच पुस्तक असावे. त्याच प्रमाणे आज इंटरनेटच्या जगात, ब्लॉग संस्कृतीत माझा मराठीमधला फुलपाखरांचा ब्लॉग हा जगातला एकमेव आहे.
त्यानंतर पुढे काही वर्षांनंतर मला माझा स्वत:चा कॅमेरा घेणे शक्य झाले. त्या ऍटलास पतंगाला मी बघितले असले तरी त्याचे छायाचित्र काही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे नंतरच्या प्रत्येक पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर मी या पतंगाला शोधायला लागलो. मुंबई आणि मुंबईच्या आसपासची अनेक जंगले पालथी घातली पण परत काही तो पतंग दिसला नाही. त्याच्या अन्नझाडावर त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेतल्या वाढणाऱ्या अळ्या दिसल्या पण प्रौढ पतंग काही सापडत नव्हता. अनेक मित्रांना राजमाची आणि इतर किल्ल्यांवर भेटी देतानासुद्धा हा पतंग दिसला पण बहुदा त्याची आणि माझी वेळ काही जुळत नव्हती.
 २००६ मधे अरुणाचल प्रदेशात “बटरफ्लाय मीट” करता गेलो असताना तिथे आम्ही रात्री पांढऱ्या चादरीच्या वर प्रखर दिवा लावायचो आणि त्यावर आकर्षित होणाऱ्या पतंगांचे निरिक्षण, छायाचित्रण करायचो. दुसऱ्याच रात्री त्या पांढऱ्या चादरीवर एक वेगळ्या प्रकारचा ऍटलास पतंग आकर्षित झाला. अगदी समोरच तो बसला असल्यामुळे आम्हाला त्याची भरपूर छायाचित्रे घेता आली. पण खरे तर त्या छायाचित्राला मजा नव्हती कारण एका पांढऱ्या फटफटीत चादरीवर तो पतंग बसला होता. त्यामुळे परत एकदा माझे त्या ऍटलास पतंगाला शोधणे सुरू झाले.
नुकताच कल्याण जवळच्या मुरबाड तालुक्यातील पळू गावात छायाचित्रण कार्यशाळा आयोजित केली होती. त्या ग्रीन व्हॅली रिसॉर्टमधेच एवढी फुलपाखरे आणि किटक दिसले की आम्ही दिवसभर त्यांचे यथेच्छ छायाचित्रण केले. रात्री जेवणानंतर कोणी तरी टूम काढली की आपण “नाईट ट्रेल”ला जाउ या. सगळेच छायाचित्रणात नविन असल्यामुले सगळ्यांनी उत्साहाने कॅमेरे आणि इतर साहित्य बाहेर काढले आणि आम्ही रिसॉर्ट्च्या आवारातच फेरफटका मारायला बाहेर पडलो. मी त्यांना वाटेन दिसणारे कोळी, छोटे पतंग दाखवत होतो आणि त्यांचे छायाचित्रण सुरू होते. एका ठिकाणी मला बांबूच्या फांदीवर कात टाकणारा नाकतोडा दिसला, सगळे त्यांच्या लेन्स वर करून त्याचे छायाचित्रण करायला लागले. एवढ्यात आमचे बाजूला लक्ष गेले तर एका झुडपावर हा भलामोठा, आवढव्य ऍटलास पतंग पंख पसरवून बसला होता. आता अर्थातच सगळ्यांनी त्या नाकतोड्याला सोडून या पतंगाकडे मोर्चा फिरवला. हे पतंग निशाचर असल्यामुळे रात्रीच कार्यरत असतात त्यामुळे मी त्यांना आधी लांबूनच छायाचित्रे घ्यायला सांगीतली आणि मी धावत माझ्या खोलीकडे कॅमेरा घ्यायला पळालो. कॅमेरा घेउन परत पळतच मी त्या ऍटलास पतंगाच्या ठिकाणी धाव घेतली. मी येइपर्यंत जवळपास सर्वांचे छायाचित्रण करून झाले होते. मी आधी सावकाश त्याची लांबूनच छायाचित्रे घेतली आणि मग हळूहळू त्याच्या जवळ सरकलो. तो बहुदा नुकताच कोषातून बाहेर आलेला असावा कारण त्याचे पंख अगदी तजेलदार होते आणि कुठेही त्याला ईजा पोहोचली नव्हती. मी जवळ गेल्यावर मग सगळेच त्याच्या जवळ पोहोचले आणि छायाचित्रण करायला लागले. त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग हा कॅमेरात बंदिस्त झाला. जवळपास दिड तास आम्ही त्याचे छायाचित्रण करत होतो. रात्रीचे बारा वाजले होते आणि आम्ही तृप्त मनस्थीतीत तिथून परतलो.                   
युवराज गुर्जर.
ygurjar@gmail.com
www.yuwarajgurjar.com
याला मधे बिबळ्याच्या मागावर...  

श्रिलंका हा एकदम चिमुकला देश, जेमतेम ६६,००० स्क्वे. कि.मि. पसरलेला. पण इथले विविधता अगदी भारतासारखीच वाखाणण्यासारखी आहे. तसे म्हटले तर हा देश भारतापासून एकदम जवळ आहे. भारतात आणि श्रिलंकेमधे जेमतेम २९ कि.मि चे अंतर आहे आणि मधे फक्त भारतिय महासागर आहे. याचमुळे श्रिलंकेला पर्ल ऑफ इंडियन ओशन असेही म्हणतात. आपल्या दक्षिण भारतासारखीच घनदाट जंगले आणि तसेच हवामान यामुळे इथली जैव विविधता वाखाणण्यासारखी आहे. इथल्या जंगलात आपल्याला ८४ जातींचे वेगवेगळे सस्तन प्राणी बघायला मिळतात. नुसते सस्तन प्राणीच नाही तर इथे वेगवेगळी सागरी कासवे, सुसरी, मगरी, स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी, फुलपाखरे अगदी सहज वेगवेगळ्या राष्ट्रीय उद्यानात बघायला मिळतात.

जगात बिबळ्यांकरता इथले याला राष्ट्रीय उद्यान अतिशय प्रसिद्ध आहे. १२९७ स्क्वे.कि.मी पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान श्रिलंकेमधील सर्वात जुने आणि सर्वात प्रसिद्ध आहे. इथले नर बिबळे अतिशय धिट असल्यामुळे भर दिवसासुद्धा ते रस्त्यावर चालताना आढळतात आणि याच कारणामुळे जगातल्या सर्व वन्यछायाचित्रकारांमधे हे जंगल आफ्रिकेच्या नंतर अगदी वरच्या नंबरावर आहे. भारतातील कान्हा / बांधवगढ मधले वाघ जसे जिपमधल्या पर्यट्कांना सरावले आहेत तसेच इथले बिबळ्या वाघ अगदी जवळून पर्यट्कांना / छायाचित्रकारांना चांगल्या पोजेस देतात. अर्थातच बिबळ्यांबरोबर इथे हत्तींचे प्रमाणसुद्धा खुप जास्त आहे. हत्तींचे मोठे मोठे कळप इथला जंगलातील तळ्यांमधे मजेत डुंबताना, खेळताना सहज दिसतात. इथल्या जंगलात या दोन मोठ्या प्राण्यांबरोबरच चितळ, सांबर, रानडूक्कर, जंगली म्हशी, कोल्हे, मुंगूस असे अनेक प्राणी आणि १२०हून अधिक प्रजातीचे पक्षी दिसतात. हे जंगल सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या काळामधे पर्यटकांसाठी बंद असते. नोव्हेंबर ते जुनचा काळापैकी डिसेंबर ते मार्च हे उत्तम महिने समजले जातात.

याला राष्ट्रीय उद्यानाच्या जवळच असलेले बुंदाला राष्ट्रीय उद्यान हे पक्षीनिरिक्षकांसाठी नंदनवन समजले जाते. २० कि.मी. च्या समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या या उद्यान अनेल विविध जातींचे पक्षी अगदी सहज बघता येतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या राष्ट्रीय उद्याना पक्ष्यांबरोबर मगर आणि सुसर दिसते, त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते जानेवारी या काळामधे चार वेगवेगळ्या जातीची समुद्री कासवे इथल्या किनाऱ्यावर अंडी घालायला येतात. समुद्रकिनाऱ्या जवळच्या जंगलामधे हत्ती, बिबळ्या दिसायची संधी मिळू शकते. इथे दिसणाऱ्या १९७ जातीच्या पक्ष्यांपैकी १३९ जातीचे पक्षी स्थानीक आहेत, तर इतर जातीचे पक्षी दूरवऊन स्थलांतर करून येतात.


या दोन अतिशय सुंदर राष्ट्रीय उद्यानांबरोबरच इथे वास्गामुवा, मिनेरीया, उदवालावे, विल्पट्टू, कौडूल्ला अशी अनेक राष्ट्रीय उद्याने बघण्यासारखी आहेत. पण भारतातल्या अनेक जंगलांमधे मला बिबळ्याने हुलकावण्या दिल्यामुळे, मी आता श्रिलंकेच्या याला जंगलामधे माझे नशिब खास बिबळ्याच्या छायाचित्रणाकरता आजमावणार होतो. निदान या जंगलात तरी आख्ख्या जगाने वाखाणणेल्या बिबळ्या मला छायाचित्रणासाठी भेटेल अशी आशा. अर्थात सोबत बुंदालाच्या जंगलाला आणि उदवालावाच्या जंगलालासुद्धा तिथल्या हत्तींकरता आणि स्थलांतरीत पक्षी आणि कासवांकरता भेट दिली. सुरवातीला मी उदवालावाच्या जंगलाला भेट दिली. पर्यटकांना पूरक असलेल्या इथल्या नियमांमुळे इथल्या जंगलात तुम्हाला अगदी दिवसभर आणि कुठल्याही भागात फिरता येत्ते. जंगलात आत शिरल्या शिरल्याच मला एका गरूडाने एका सरड्याची शिकार केलेली बघायला मिळाली. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर हत्तींची दोन पिल्ले दिसली. असेच प्राणी, पक्षी बघत बघत आम्ही एका विस्तीर्ण तलावाच्या काठावर आलो. तळ्यामधे रंगीत करकोचे, बदके, बगळे, पेलीकन असे अनेक पक्षी होते. त्यांचे छायाचित्रण करून आम्ही पुढे निघालो. नंतरच्या एका वळणावर रस्त्याच्या कडेलाच एक हत्तींची मोठी फॅमीली होती. त्यातल्या एका आईच्या कडेला अगदी नुकतेच जन्मलेले छोटेसे पिल्लू होते आणि ते कायम आईच्या आडोश्याने चालत होते. त्या पिल्लाचे एकट्याचे छायाचित्र घेण्याकरता आम्ही बराच प्रयत्न केला पण शेवट्पर्यंत ते त्याच्या आईच्या पलिकडे आणि तिच्या चार पायांमधेच घोटाळत फिरत होते. संध्याकाळी जंगलातून परतायच्या वेळी रस्त्याच्या अगदी मधोमध दोन मोर एकमेकांभोवती गिरक्या घेत घेत फिरत होते. आमच्या गाईड्च्या म्हणण्याप्रमाणे ते एकमेकांशी भांडत होते आणि खरोखरच मधेच त्यांनी दोघांनी अगदी हवेत एक छोटी उडी घेउन एकमेकांवर हल्ला केला. यानंतर ते परत एकमेकांभोवती गिरक्या घ्यायला लागले आणि परत त्यांनी हवेतच हल्ला चढवला. जंगलातल्या अश्या अनेक गमतीजमती बघून आम्ही शेवटी बाहेर पडलो.

यानंतर आम्ही जाणार होतो ते याला च्या जंगलात, अर्थात बिबळ्याचे दर्शन घ्यायला. मात्र निरोपाचा काहीतरी गोंधळ झाला आणि आम्ही जंगलात दिड तास उशीरा पोहोचलो. उन्हे हळूहळू उतरायला लागली होती. रस्त्यामधे आम्हाला तलावांमधे मोठ्या सुसरी दिसल्या. काळ्या मानेचे ससे तर अगदी रस्त्याच्या बाजूलाच गवत खाताना दिसत होते. मोठ्या मोठ्या घोरपडी रस्त्याच्या कडेला, झाडांच्या खोडावर अगदी सहज दिसत होत्या. पण ज्याचे दर्शन व्हायला पाहिजे होते तो बिबळ्या काही दिसत नव्हता. संध्याकाळची वेळ संपत आली होती आणि आम्हाला जंगलाच्या बाहेर पडणे जरूरीचे होते. सगळेच अगदी निराश झाले होते पण आनंदाची गोष्ट म्हणजे दुसरे दिवशी आम्ही आख्खा दिवस, अगदी पहाटे ६ ते संध्याकाळी ६ जंगलात फिरणार होतो.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही जंगलात जाण्याकरता निघालो. रस्त्यात दिसणारे पक्षी, प्राणी यांचे निरिक्षण करत, त्यांचे छायाचित्रण करत करत पुढे जात होतो. मधे भेटणाऱ्य़ा प्रत्येक जीपला आम्ही बिबळ्या दिसला का याची विचारणा करत होतो, पण त्या दिवशी सकाळच्या वेळात बहुतेक कोणीच बिबळ्या बघितला नव्हता. अश्याच एका वळणावरून जाताना आमच्या जिपच्या समोरच एक बिबळ्या अगदी रस्त्याच्य मधून पुढे जात होता. अर्थात आमच्या गाडीचा आवाज ऐकून त्याने त्याच्या वेग वाढवला आनि बाजूच्या दाट झाडीत तो गायब झाला. काही क्षणांकरता त्याने आम्हाला पाठमोरे दर्शन दिले होते. आम्ही पुढे गाडी दामटवली आणि अंदाजे तो कुठे बाहेर पडेल त्याठिकाणी त्याची वाट बघत राहिलो. ५/१० मिनिटे झाल्यावर आम्ही आमच्या कॅमेरात त्याची पाठमोरी आलेली छायाचित्र बघण्यात दंग झालो आणि तेवढ्यात.....मागच्या आमच्या दुसऱ्या जिपमधून आवाज आला. तो बिबळ्या परत एकदा त्यांच्या अगदी समोरून रस्ता क्रॉस करूने गेला आणि आमच्या अगदी मागेच होता. आम्ही मात्र आमच्या मुर्खपणामुळे छायाचित्रणाची संधी गमावली होती. भारतात तर कधी बिबळ्या दिसलाच नाही, श्रीलंकेत दिसला तर त्याचे छायाचित्रणच जमले नाही. परत एकदा नशिबाने दगा दिला.....अर्थात याच कारणामुळे परत एकदा जंगालात त्याला शोधायला बाहेर पडायचे हा निश्चयही याचमुळे पक्का झाला.

युवराज गुर्जर.
ygurjar@gmail.com

Thursday, July 19, 2012


फुलपाखरांची अंगत पंगत.....   

मार्च / एप्रिलच्या महिन्यात थंडी गायब होते आणि अचानक उन्हाच्या झळा जाणवू लागतात. याच काळात पानझडी जंगलामधे सगळ्या झाडांची पाने गळून गेल्यामुळे जंगले उघडी बोडकी दिसायला लागतात. आधीच वरून सुर्य तळपत असतो आणि हिरव्या पानांचे आच्छादन गायब झाल्यामुळे त्या उन्हाचा तडाखा जरा जास्तच जाणवतो. आता या अश्या रूख्यासुक्या जंगलात भटकताना छायाचित्रण तसे कमीच होते. अर्थात या कारणामुळे जर का आपण जंगलाला भेट दिली नाही तर तो खरोखरच वेडेपणा ठरेल कारण हाच काळ फुलपाखरांच्या दिसण्याचा आणि त्यांच्या छायाचित्रणाकरता उत्तम समजला जातो. बऱ्याच जणांचा असा समज असतो की पावसाळ्यात आणि जिथे फुले खुप असतात त्या वेळी आणि त्या ठिकाणी फुलपाखरे जास्त सापडतात. मात्र या उन्हाळ्याच्या गरम दिवसात सुद्धा बऱ्याच जातीची फुलपाखरे मोठ्या संख्येने चिखलपान करताना एकत्र दिसतात.



आता हे चिखलपानसुद्धा काय असते ते मला अगदी अचानकच कळले. खुप वर्षांआधी उन्हाळ्याच्या सुट्टीत पनवेलजवळच्या कर्नाळ्या किल्ल्यावर ट्रेकींगसाठी गेलो असताना, गडावरच्या टाक्यातील पाणी आणण्यासाठी आमची शोधाशोध सुरू होती. मी एका कोरड्या नाल्यामधून त्याच्या उगमाकडे वर वर चढत होतो. खरे तर तो एक कोरडा पडलेला धबधब्याचा झालेला ओढा होता. एका ठिकाणी खडकाच्या घळीमधे पाण्याचा थोडासा साठा होता आणि त्यातले काही पाणी खाली झिरपत होते आणि त्याचा चिखल झाला होता. मी एकदम पुढे गेलो तर एकदम शे / दोनशे फुलपाखरे भर्रकन उडाली. मी एकदम अचंबित होऊन थबकलो आणि बघितले तर जवळपासच्या चिखल्याच्या भागावर अनेक जातीची फुलपाखरे जणु त्यांना तिथे चिकटवले आहे अशी बसली होती. हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. एरवी एकेक फुलपाखरू दिसते आणि त्याच्या मागे मागे छायाचित्रणासाठी पळावे लागते पण इथे तर वेगळाच प्रकार दिसत होता. शेकडो वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे मोठ्या संख्येने एकत्र शांत आणि तीसुद्धा जमिनीवर बसलेली म्हणजे छायाचित्रकारांची तर पर्वणीच म्हणायची.

परत आल्यानंतर या प्रकाराबद्द्ल अधिक माहिती शोधली. सहसा फुलपाखरे अनेक फुलांना भेटी देउन त्यातील मधुर रस अथवा मध प्राशन करतात पण याच जोडीला त्यांच्या शरीराला अनेक इतर क्षारांची गरज असते ती फक्त त्या मधातून पुर्ण केली जाउ शकत नाही. या करता त्यांना मग इतर पदार्थांमधून ते क्षार मिळवायला लागतात. या फुलपाखरांचे नर जेंव्हा चिखलपान अथवा  mud puddling  करतात तेंव्हा त्यांना सोडियम आणि अमिनो आम्ले मिळतात. मादीबरोबर मिलन करताना ही पोषक द्रव्ये मादीला दिली जातात ज्याचा फायदा त्यांची अंडी वाढण्याकरता होतो. फुलपाखरांचे चिखलपान सहसा उन्हाळ्यात होते. पानगळी रानांमध्ये, उन्हाळ्याच्या कोरड्या दिवसात ही फुलापाखरे मोठया संख्येनी पहायला मिळतात. अतिशय जलदगतीने उडणारी ही फुलपाखरे तापमान वाढू लागले की रानातील झऱ्याजवळ, ओढयाजवळच्या ओल्या जमिनीवर, चिखलावर बसलेली पहायला मिळतात. एका वेळी अक्षरश: शेकडो वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे एकाच ठिकाणी अगदी एका ताटात जेवल्याप्रमाणे एकत्र बसलेली आढळतात. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधे स्पॉट स्वोर्डटेल, कॉमन जे, ब्लू बॉट्ल, इमीग्रंट, कॉमन गल, झेब्रा ब्लू, ग्राम ब्लू, लेपर्ड, ग्रास ज्वेल, सनबीम अशी अनेक फुलपाखरे असे चिखलपान करताना आढळतात. उत्तर भारतात आणि दक्षीण भारतात आपल्यापेक्षा अनेक वेगवेगळ्या आणि मोठ्या जातीसुधा असे चिखलपान करताना दिसतात. या वेळेला अर्थातच त्यांचे छायाचित्रण आपल्याला सहज करता येते आणि एकाच जागी अनेक वेगवेगळ्या जाती आपल्याला छायाचित्रणासाठी मिळू शकतात.
अर्थात असे चिखलपानाचे “स्पॉट” शोधून काढावे लागतात. सगळ्याच सुक्या ओढ्या / नाल्यांमधे हे चिखलपान होत नाही. त्या ठिकाणी थोडा चिखल, थोडी सुकी माती, मोठे दगड आणि प्रचंड उन असे सगळे व्यवस्थित जमले तर चिखलपान होते. मात्र असे एखादे ठिकाण जर आपल्याला सापडले तर मात्र दरवर्षी त्या ठिकाणी चिखलपान होतेच होते. फक्त ते होण्याचे दिवस उन्हाच्या तडाख्याप्रमाणे आणि त्या ठिकाणचे पाणी सुकण्याप्रमाणे पुढे मागे होतात. आतापर्यंत गेल्या काही वर्षात मी कर्नाळा अभयारण्य, येऊर, फणसाड, तुंगारेश्वर, बोंडला, नेत्रावली अशा अनेक जंगलात हे फुलपाखरांचे चिखलपान सातत्याने बघत आलो आहे. मार्च / एप्रिल झाला की या ठिकाणांना रणरणत्या उन्हात भेट द्यायची. तळपत्या उन्हात आणि तापलेल्या दगडांवर कुठे एखादा सावलीचा तुकडा असेल तर त्यावर बुड टेकवून तासन तास फुलपाखरांची वाट बघायची. ती बिचारी फुलपाखरेसुद्धा इतर मोठ्या प्राण्यांसारखा त्रास देत नाहित आणि आजूबाजुला उडत रहातात. हो पण दरवेळेला ते समोर बसून आपल्याला छायाचित्र देतीलच असे मात्र नक्कीच नाही. ती आपली त्यांच्याच मस्तीत, मजेत गिरक्या घेत आजूबाजूला लहरत रहातात आणि त्यांना वाटेल त्याच वेळेस बसतात. खरेच सांगतो त्या फुलपाखरांना बघताना, त्यांचे छायाचित्रण करताना त्या रणरणत्या उन्हाच्या त्रासाचे फारसे काहीच वाटत नाही. 
या फुलपाखरांमधे नाजुकशी ब्लू जातीची अनेक छोटी छोटी फुलपाखरे असतात. मोठ्या आकाराची इमीग्रंट, स्पॉट स्वोर्ड्टेल, कॉमन जे सुद्धा असतात. या फुलपाखरांचे छायाचित्रण सुरू असतानाच मधेच एक गडद रंगाचे चपळ गॉडी बॅरन जातीचे झळाळणाऱ्या हिरव्या रंगाचे लाल ठिपके असलेले फुलपाखरू बाजूला येते आणि मग त्याच्या मागे मागे पळावे लागते. त्याचे छायाचित्रण सुरू असतानाच लांबच्या चिखलाच्या भागावर अलगद ब्लू ओकलीफ अवतरते. मग काय सगळा जामानिमा सावरत त्याच्या मागे पळावे लागते. वेगवेगळ्या भागात सतत फेऱ्या मारून कुठे वेगळी आणि सहज न दिसणारे फुलपाखरे तिथे आला आहेत का हे बघावे लागते. यामुळे वर्षभरात न दिसणारी फुलपाखरे आपल्याला टिपता येतात. इथे एक कायम लक्षात ठेवायचे की “हातचे सोडून पळत्याच्याच” मागे लागायचे आणि कायम “हाजीर तो वजीर” असेच समजायचे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

सुंदरबन तिवरांचे जंगल.....  

जंगल म्हणजे आपल्याला डोंगर दऱ्यांच्या कुशीत दडलेली घनदाट झाडी अपेक्षित असते पण सुंदरबनचे जंगल याला अपवाद आहे. सुंदरबन (बंगाली भाषेतील सुंदर जंगले) म्हणजे जगातील एक मोठा चमत्कार आहे. या जगातील सर्वात मोठ्या तिवरांच्या जंगालाची व्याप्ती आहे २६,००० चौ.कि.मी. जी जगातली एकमेव सलग तिवरांची जंगले आहेत. यातील दोन तृतीयांश भाग जरी बांगलादेशात असला तरी भारतातील सुंदरबन हे ९६३० चौ.कि.मी. आहे. इथल्या वैविध्यपुर्ण प्राणि, पक्षी आणि झाडांच्या जातींमुळे, लोकांचे जनजिवन आणि त्यांची संस्कृती, नदी आणि खाड्यांचा अनोखा मिलाफ यामुळे इथे लाखो देशी / विदेशी पर्यट्क आकर्षित होतात. जगातील सर्वाधिक म्हणजे २७४ भारतिय वाघांचा वावर इथल्या जंगलांमधे आहे. इथले वाघ नरभक्षक असल्याच्या गैरसमजुती आणि त्यांच्या खाऱ्या पाण्यातील वावरामुळे त्यांच्याबद्दल अजुनच आकर्षण वाढले आहे.

१९७३ मधे घोषित झालेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांमधे सुंदरबन हे प्रमुख होते. इथल्या महत्वाच्या जैवविविधतेमुळे आणि सतत बदल होणाऱ्या भौगोलीक बदलांमुळे १९८७ मध्ये IUCN  ने या जंगलाला “world heritage site” म्हणून घोषित केले तर १९८९ मध्ये  UNESCO  ने या जंगलाला “Biosphere Reserve” ची मान्यता दिली. यानंतरही ही जागा उत्तम पाणथळीची आहे म्हणून तीची गणना “Ramsar Site” मध्ये करण्यात आली. इथे गंगा नदीच्या खालचा भाग ज्याला हुगळी नदी म्हट्ले जाते तो बंगालच्या महासागरात मिळ्तो. यामुळे इथे अनेक खाड्या तयार झाल्या आहेत आणि भरती ओहोटेच्या वेळेस अगदी १५ फुटांपेक्षा जास्त पाणी इथे भरले किंवा ओसरले जाते.

सुंदरबन जरी तिवरांचे जगातील सर्वात मोठे जंगल असले तरी नक्कीच इकडच्या वाघांमुळे हे जास्त प्रसिद्ध आहे. भारतातील इतरत्र आढळणाऱ्या वाघांपेक्षा इकडचे बाघ आणि त्यांच्या रहाण्याच्या / जगण्याच्या सवयींमधे जमिन अस्मानाचा फरक आहे. दिवसभरात इथे दोन वेळा भरती आणि ओहोटी येते त्यामुळे जमिनीचा बराचसा भाग पाण्याखाली जातो आणि जेंव्हा पाणि ओसरते तेंव्हा तिथे दलदल असते. यामुळे इथेल्या वाघांना धावत जाउन शिकार करणे खुप कठिण असते. याचमुळे इथल्या वाघांना बऱ्याच वेळेला मासे आणि खेकडे मारून भूक भागवावी लागते. सगळीकडे पाणि असल्यामुळे इथले वाघ पट्टीचे पोहोणारे आहेत आणि बऱ्याच वेळेला जर का ते दिसले तर ते खाड्या पोहत पार करताना दिसतात. गोड्या पाण्याच्या अभावामुळे इथला वाघ साधारणत: खारे पाणी पिताना दिसतो. ज्या बाजूला गावे वसलेली आहेत त्या त्या ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडांच्या बाजूने जाळी लावलेली आहेत जेणेकरून वाघाला त्या बाजूने गावात शिरता येणार नाही. 


या खास प्रकारच्या अधिवासामुळे इथे वाघ दिसणे हे फार दूर्मिळ. वाघांचे सोडूनच द्या पण इतरही वन्य प्राणी इथे दिसणे म्हणजे नशिबाचीच बाब, कारण आपला सगळा प्रवास हा बोटीने होतो त्यामुळे फक्त किनाऱ्यावर जर का कोणी प्राणी आले तरच ते आपल्याला दिसणार. पण अर्थातच याच कारणामुळे अनेक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी आपल्याला सहज दिसू शकतात. सुंदरबनची खासियत म्हणजे इथे आपल्या सात वेगवेगळ्या जातीचे, रंगीबेरंगी खंड्या पक्षी दिसतात. या खंड्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बगळे, करकोचे, पाणकावळे हे खाडीच्या कडेला असलेल्या तिवरांच्या झाडांवर दिसतात. मधेच एखाद्या पाण्याच्या पट्ट्याच्या आत आपल्याला वेगवेगळी बदके मोठ्या थव्याने एकत्र पाण्यात खाणे शोधताना दिसतात. सगळीकडे तिवरांचे जंगल असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रकार अगदी सहज दिसतात. या तिवरांची एखाद्या भाल्याच्या फाळासारखी दिसणारी चिखलातून वर आलेली मुळे खरोखरच मजेशीर दिसतात. आपला नशिब जर का जोरावर असेल तर खाऱ्या पाण्यातली अजस्त्र सुसर आपल्याला काठावर विसावलेली आढळू शकते.
 
इथल्या आदिवासींचे जिवन अतिशय खडतर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना बोटीवर अवलंबून रहावे लागते. माणसांची आणी सामानाची ने-आण करण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नसतो. त्यांना उपजिवीकेसाठी मासेमारी, जंगलातून मध गोळा करणे, लाकूडफाटा जमवणे हीच काही मोजकी साधने आहेत. त्यातून त्यांना वाघापासून अतिशय सावध रहावे लागते. वन खात्याचे अधिकारीसुद्धा त्यांना अभयारण्य़ात चोरून मासेमारी केल्याबद्द्ल पकडतात. जंगलातले आणि नैसर्गिक धोके टळावे म्हणून सर्व गावकरी / आदिवासी “वन देवीची” पुजा करतात. नवलाची गोष्ट म्हणजे अगदी हिंदू आणि मुसलमान सुद्धा भिन्न धर्मिय असले तरी दर वेळेस बाहेर जातान या वन देवीची पुजा करतात. जंगलामधे, गावांमधे, प्रत्येक बेटावर या देवीचे देऊळ बांधलेले आहे.

आतापर्यंत अनेक जंगलांमधे पायी फिरलो आहे. मोठ्या मोठ्या राष्ट्रीय उद्यानांमधे जिप अथवा उघड्या वाहनाने फिरलो आहे. त्याठिकाणचे वन वैभव बघणे आणि छायाचित्रण करणे हे वेगळे कसब असते. पण सुंदरबन मधे कायम तुम्हाला बोटीने फिरावे लागते. इथे तसे वन्य प्राणी अगदी कमी दिसतात. वेगवेगळे पक्षी दिसले तरी त्यांचे छायाचित्रण शक्य होतेच असे नाही कारण एखाद्या जीपसारखी बोट पटकन बंद करता येत नाही. बोट चालता चालता छायाचित्रण करायचे म्हटले तर बोटीची थरथर छायाचित्रणात जाणवते त्याची खास काळजी घ्यावी लागते. असे असले तरी त्या बोटीतून नुसते फिरणे, त्या अनोख्या तिवरांच्या जंगलाचा निरिक्षण करणे आणि मग जमलेच तर छायाचित्रण करणे ही काही वेगळीच मजा आहे.

मी सुंदरबनच्या जंगलात खरतर तिकडच्या खाडीमधे दिवस दिवस प्राण्यांच्या मागावर फिरलो पण म्हणावे तसे काही त्यांचे दर्शन झाले नाही. पक्षी खुप दिसले पण त्यांचे छायाचित्रण काही होऊ शकले नाही. ३/४ दिवस सतत फिरून जेंव्हा परत निघणार त्या दिवशी आम्हाला वनखात्याची बोट दिसली. त्या बोटी मधे एक बोकड बांधला होता. आमच्या नावाड्याने सांगीतले की जवळपास कुठच्या तरी गावाच्या जवळ वाघ आला असणार म्हणून त्याला पकडण्यासाठी वनखात्याचे लोक आमिष म्हणून तो बोकड घेऊन चालले आहेत. त्या गावाच्या जवळ ते वन अधिकारी पिंजऱ्यामधे त्या बोकडाला पिंजऱ्यात बांधणार, त्याला खायला वाघ आला की त्याला पकडून लांब दूरवर सोडून देणार. हे आम्ही ऐकून आमच्या हॉटेल ला सामान न्यायला परत आलो तर बातमी कळली की आमच्या हॉटेलच्या बेटावरच, अगदी आमच्या दरवाज्यासमोरच एक भलामोठा नर वाघ अर्धा तास काठावर बसला होता आणि त्याला पकडण्यासाठीच ते वन अधिकारी आले होते. अर्थातच आम्हाला काही तो वाघ बघता आला नाही पण त्याच्या बद्दलच चर्चा करत करत आम्ही परतेच्या प्रवासाला लागलो.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

वेळासचा कासव महोत्सव.....   

गेली ६/७ वर्षे मी कोकणातल्या वेळास गावी फेब्रुवारी / मार्च महिन्यात खास कासवांकरता सातत्याने जात आहे. पुर्वी या गावाचे नावही बहुतेक नकाशावर नव्हते आणि रस्त्यावर या गावाच्या नावाची पाटीही नव्हती. पण आता मात्र चित्र अगदी बदलले आहे, आज इंटरनेटवरही वेळासचे Maps, माहिती, ब्लॉग्ज वाचायला सहज मिळतील. २००६ मधे मी सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांच्या श्री. भाउ काटदरेबरोबर पहिल्यांदा वेळासला गेलो. त्यांच्या कडून ही कासवे वेळासच्या किनाऱ्यावर कशी अंडी घालायला येतात, त्यांच्या अंड्यांना कोणाचा धोका असतो, मग अंड्यातून पिल्ले कशी बाहेर येतात आणि समुद्रात जातात याची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष बघितले.

यानंतरच्या वर्षी कासव संवर्धनात गावातल्या लोकांचा सहभाग वाढावा आणि त्यांनासुद्धा काहीतरी आर्थिक मदत मिळावी म्हणून वेळास कासव महोत्सवाचे आयोजन सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने केले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटकांनी वेळास गावाला भेट द्यावी, गावातील लोकांबरोबर त्यांच्या घरी रहावे, जेवावे आणि कासव संवर्धनाचे काम प्रत्यक्ष बघावे असा उद्देश होता. पर्यटक रहायला आल्यामुळे गावातल्या लोकांना थोडेफार उत्पन्न मिळणार होते तर पर्यटकांना गावतल्या घरात रहायचे वेगळेपण. त्याचबरोबर कासवाची लहान लहान पिल्ले कशी सागरात तुरूतुरू पळत जातात त्याची मजा काही औरच असते, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होते.

ऑलिव्ह रिडले ही सागरी कासवांची जात मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी एका जागी येउन अंडी घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज जगात मेक्सीको, कोस्टा रिका आणि भारतातील ओरीसा हे जगातील सर्वात मोठ्या घरट्यांच्या जागा असलेले समुद्रकिनारे आहेत. या किनाऱ्यांवत अक्षरश: लाखो कासवे एकाच वेळेस येउन अंडी घालतात. यामुळे ही ठिकाणे कायम शास्त्रज्ञ आणि पर्यटकांनी गजबजलेली असतात. आपल्या महाराष्ट्राला एकूण ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्याचा प्रमुख भाग कोकणात येतो. मात्र या कुठल्याच भागात सागरी कासवांच्या बाबतीत माहिती उपलब्ध नाही. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांनी २००० साली या किनारपट्टीचे सर्वेक्षण केले आणि त्यांना या संपुर्ण किनाऱ्यावर सागरी कासवे तुरळक प्रमाणात विणीसाठी येत असल्याची नोंद केली. सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात दररोज किनाऱ्यावर गस्त घालून कासवांच्या घरट्यांचा शोध घेण्यात येतो व त्या घरट्यातील अंडी त्याच किनाऱ्यावर उभारलेल्या कुंपणात संरक्षित करण्यात येतात आणि योग्य वेळी घरट्यातून बाहेर आलेली पिल्ले समुद्रात सुरक्षीतपणे सोडण्यात येतात. आजपर्यंत या उपक्रमामुळे जवळपास ३०,००० हून अधिक पिल्ले समुद्रात सोडली गेली. असे समजले जाते की कासवाची मादी प्रौढ झाल्यावर ती ज्या किनाऱ्यावर जन्मली त्याच किनाऱ्यावर अंडी घालायला कित्येक किलोमीटरचा प्रवास करून येते. त्यामुळे अजून काही वर्षांनंतर या वेळासच्या किंवा आजूबाजूच्या किनाऱ्यांवर या कासवांचे प्रमाण निश्चीतच वाढलेले दिसेल.

वेळासला जाताना मात्र मनाची पुर्ण तयारी करून जावी लागते कारण कासवाची पिल्ले बाहेर येणे हे पुर्णत: नैसर्गिक आहे आणि ती आपण जाउ त्याच दिवशी बाहेर येतील याची काही खात्री नसते. सकाळी साधारणत: ८ / ८.३० च्या सुमारास आणि संध्याकाळी ५.३० नंतर ही पिल्ले सोडण्यात येतात. या दोनही वेळी प्रकाश तसा कमी असल्यामुळे छायाचित्रण तसे कठिण असते. परत पिल्लांना कॅमेराच्या फ्लॅशचा त्रास होत असल्यामुळे, फ्लॅश वापरणे शक्य नसते त्यामुळे कॅमेरावरच नियंत्रण ठेवून छायाचित्रण शक्य होते. मी आतापर्यंत बऱ्याच वेळेला वेळासला गेल्यामुळे मला छायाचित्रणाच्या अनेक संधी मिळाल्या. एकदा संस्थेच्या कार्यकर्त्याने कासवाच्या घरट्यावरची उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून घातलेली टोपली उचलली आणि खाली बघतो तर ३ पिल्लांची फक्त डोकी वर आली होती आणि त्यांची पुर्ण बाहेर यायची धडपड सुरू होती. काही सेकंदातच ती वाळूच्या पुर्ण बाहेर आली पण तोपर्यंत मात्र मला त्यांची बाहेर येतानाची आणि त्यांच्या धडपडीची अनेक छायाचित्रे मिळाली होती. 


या नंतरच्या वर्षी संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस जी काही पिल्ले बाहेर आली त्यांचे सुर्यास्ताबरोबर छायाचित्रण करता आले. यावेळेस "वाईड" ऍंगल लेन्स वापरल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पाण्याच्या लाटेजवळ जाणारी इवलीशी कासवे आणि मागे समुद्रात मावळणारा सुर्य असे छायाचित्र घेता आले. पुढच्याच वर्षी मी पोहोचलो त्याच्या आदल्या रात्री एक कासवाची मादी घरटे करून अंडी घालून गेली होती आणि तीच्या पायांचे ठसे समुद्राच्या मऊ वाळूत उमटले होते त्याचे छायाचित्रण करता आले. गेल्या वर्षी ३ पिल्ले तुरूतुरू समुद्राकडे पळत होती आणि समुद्रकाठच्या मऊशार वाळूत त्यांची ईवलीशी पावले उमटत होती त्याचे छायाचित्र मिळाले. याच वेळेस अगदी त्या ओल्या कंच वाळून ओणवून एका कासवाच्या पिल्लाच्या छायाचित्रणात दंग असलेल्या छायाचित्रकारांचेच छायाचित्र मला घेता आले. हे असे काही वेगळे छायाचित्रण किंवा घरट्यातून पिल्ले बाहेर नक्की त्याच दिवशी बाहेर येणार की नाही ही उत्कंठा खरोखरच मजेशीर असते. या वेळासच्या कासवांच्या पिल्लांच्या छायाचित्रणाबरोबरच वेळासला जातानाचा बाणकोटचा किल्ला, वेळासचा स्वच्छ समुद्रकिनारा, त्यावर आलेले स्थलांतरित पक्षी, निळ्याशार सागरावर होणारा सुर्यास्त असे बरेच काही छायाचित्रण करता येते. गावातल्या प्रत्येक घराच्या मागे नारळा, सुपारीच्या बागा आहेत. याच बागांमधे अधेमधे जायफळ, कोकमासारखी सहसा न दिसणारी झाडे बघायला मिळतात. ह्या वाडी मधे मऊशार ओल्या मातीत अनवाणी चालताना आणि तिथेच उघड्यावर विहीरीतून / हौदातून थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचा अनुभव खरोखरच शब्दात न व्यक्त करण्यासारखा आणि स्वत: प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

पावसाळ्यातील हिरवाई....  

एप्रिल / मे च्या उन्हाळी तडाख्यात जंगलाची पुर्ण रया जाते. सगळीकडे जाउ तिथे रखरखाट, सुकलेली झाडे, पान नसलेली खराट्यासारखी झुडपे अगदी जमिनीवरसुद्धा सुके पिवळे गवत. पण जून महिन्याच्या सुरवातीसच आकाश झाकोळायला लागते, प्रकाश हळूहळू कमी व्हायला लागतो, काळे ढग जमायला लागतात, गडगडायला लागते आणि पावसाळा येऊ लागल्याची खात्री पटायला लागते. अचानक टपोरे थेंब कोसळायला सुरूवात होते. तापलेली, कोरडी जमीन पहिला पाऊस आणि त्याचा ओलेपणा शोषायला लागते. मातीचा छानसा वास हवेत दरवळायला लागतो. डोंगरावर सुर्यकिरणांना हे काळे ढग झाकोळून टाकतात. त्यांचा क्षणाक्षणाला बदलणारा आकार आणि गुलाबी, लाल, पिवळा, भगवा आणि एवढेच काय पण सोनेरी रंगसुद्धा मनाला एकदम प्रसन्न करतो.

अगदि एप्रिल, मे महिन्यापर्यंत आपल्याकडचे जंगल हे पानगळी असल्यामुळे तिथे फक्त निष्पर्ण झाडे आणि त्यांचा कोरडा तपकिरी रंग एवढेच दिसत असते. मधूनच एखादा कुठे हिरवा भाग असला तर असतो. पण हे चित्र जून  महिन्याच्या सुरवातीलाच बदलून जाते. धूळ भरलेली झाडे पुसल्यासारखी चकचकीत होतात तर सुकलेली वाळकी, तपकिरी झाडे एकदम हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छ्टांमधे बदलून जातात. आता संपुर्ण वातावरण, हवामान आणि एकंदर सगळे दृष्यच जादूगाराची छडी फिरवावी तसे पालटून जाते. सगळीकडे चकचकीत, झळाळणारा हिरवा रंग एखाद्या कात टाकलेल्या सापाप्रमाणे दिसू लागतो. रस्त्याच्या आजूबाजूनी छोटे छोटे नाले सगळा पालापाचोळा, काटक्या घेउन वाहायला लागतात. नंतर धबधब्यांमधे पांढरेशुभ्र पाणी खळखळायला लागते.

या मोसमात आपल्याला किटकांच्या आणि झाडाझूडपांच्या बऱ्याच नवनवीन जाती बघायला मिळतात. अगदी रस्त्यावरच आपण शेकडोंनी लाल, भगव्या रंगाचे "सिल्क कॉटन बग्ज", जायंट वूड स्पायडरची भलीमोठी जाळी चमकताना दिसतात. पहाटे पहाटे पावशा (ब्रेन फिव्हर बर्ड) ओरडताना ऐकू येतो. नशीब अगदीच जोरावर असेल तर एखादा मोरसुद्धा नाचताना आढळू शकतो. पार्श्वभुमीवर बेडकांचे "डराव डराव" सुरू असते. खेकड्यांच्या माद्या नाल्याच्या आजूबाजूला त्यांची पिल्ले टाकायला पळताना दिसतात.

अगदी पावसाची एखाद दुसरी सर पडून गेली की काही जंगली लिली, काळी मुसळी ही फुलायला लागते. मजेची बाब अशी की ह्या वनस्पती जेमतेम ७ / ८ दिवसच दिसतात. त्यामुळे त्यांना बघायला तुम्ही चुकलात तर थेट पुढच्या वर्षीपर्य़ंत वाट बघायची. थोडा जास्त पाउस झाला की त्यावेळेला दिसणाऱ्या दुसऱ्या छोट्या वनस्पती आहेत. जंगली हळद किंवा कुरकूमा चे लाल, गुलाबी, जांभळे फुलांचे तुरे अगदी जमिनीतूनच बाहेर आलेले असतात. बचनाग किंवा ग्लोरी लीली चा वेल याच वेळेस बहरतो. ह्याच्या फुलांचा रंग आणि आकारसुद्धा अतिशय आकर्षक असतो. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबी / जांभळ्या रंगाच्या तेरड्याचे रान फुललेले असते. सात वर्षांनी फुलणारी जांभळी कारवीसुद्धा तुम्ही याचे वेळेस दिसू शकते. याच काळात सोनकी, पेव, लिया ह्यांचीसुद्धा फुले फुलतात ज्यावर खुप वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे आणि इतर किटक आकर्षित होतात.

बऱ्याचश्या पक्ष्यांचा पण हा विणीचा हंगाम असतो कारण ह्यावेळी त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांसाठी खुपसारे खाणे उपलब्ध असते. ताडाच्या उंच झाडावर बया सुगरण पक्षी आपापली सुंदर घरटी बांधत असतात. बया पक्षी त्यांच्या उत्तम घरटे बनवण्याच्या कलाकुसरीकरता जगप्रसिद्ध आहेत. नर पक्षी अर्धे घरटे बांधून मादीची वाट बघतो, घरटे जर मादीच्या पसंतीस उतरले तर जोडी जमते. नंतर मादी घरट्यात अंडी उबवत बसते आणि नर नविन घरटे बांधून नविन मादीला आकर्षीत करतो. ह्याच वेळेस खंड्या पक्षी नदी नाल्याच्या बाजूला मातीमधे बीळ खोदून आपले घरटे त्यात बनवत असतो. यामुळे त्याच्या पिल्लांना बारीक मासे, बेडूक लगेचच बाजूला उपलब्ध होतात. याच काळात बुलबुल, साळुंक्या, मॅग पाय रॉबिन, शिंपी, वेगवेगळ्या जातीचे मक्षीमार असे अनेक पक्षी आपापली घरटी बनवण्यात, पिल्लांचे जोपासना करण्यात गर्क असतात.

किटक बघण्याकरता तर हा काळ सर्वोत्तम असतो. नविन पाने, नविन फुले ह्यांची लयलूट असते त्यामुळे ह्या किटकांना प्रचंड खाणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पिल्लांसाठी मिळू शकते. ह्यावेळी आपण रंगीबेरंगी नाकतोडे, ढालकिडे, मुंग्या, चतूर बघू शकतो. फुलपाखरे आणि पतंगांकरता तर ह्यासारखा मोसम नाही. अतिशय रंगीत यामफ्लाय, सिल्व्हरलाईन, ग्रास डेमन, बॅरोनेट सारखी छोटी तर ब्लू मॉरमॉन सारखी मोठी फुलपाखरे दिसतात. ऍटलास मॉथ सारखा जगातला सर्वात मोठा पतंगपण याच वेळेला फक्त दिसतो. हा पतंग मोठा म्हणजे अगदी एक फुटाएवढापण मोठा असू शकतो. मून मॉथ सारखा अतिशय आकर्षक आणि मोठा पतंगसुद्धा फक्त याच वेळी दिसू शकतो. या काळात दिवसा झळाळणारे ज्युवेल बीटल्स दिसतात तर रात्री काजवे मंदपणे चमकताना दिसतात. 


तर असा नितांतसुंदर निसर्ग बघायला, त्यातले वेगवेगळे आकर्षक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती बघायला आपण आसपासच्या कुठल्याही जंगालात आपण जाउ शकतो. बरीचशी मोठी जंगले प्राण्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे साधारत: जुनच्या शेवटी प्रवाशांकरता बंद होतात ती थेट सप्टेंबर महिन्यापर्यंत. त्यामुळे अशा वेळेस लहान जंगलांना, जिथे आपल्याला चालत फिरायची परवानगी असते तिथे भेट देणे उत्तम. पण याच वेळेस डोंगरावरती मोठे ओढे किंवा धबधबे असतात तिथे पर्य़टकांचे लोंढेच्या लोंढे येतात. त्यातल्या बऱ्याच जणांना निसर्गाचा आस्वाद घेण्यापेक्षा दारू पिउन धिंगाणा घालण्यात जास्त रस असतो. सोबत नेलेल्या दारूच्या कोल्ड्रींकच्या बाटल्या तिथेच टाकणे, फोडणे, इतर कचरा करणे यामुळे त्या निसर्गरम्य ठिकाणाची वाट लागते. इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो तो वेगळाच. वन खाते, पोलीस खात त्यांचा नेहेमीप्रमाणे सरकारी खाक्या दाखवतात आणि त्या स्थळावरच बंदी आणतात. त्यांना निसर्गप्रेमी अभ्यासू पर्यटक आणि दारू पिउन धिंगाणा घालणारे पर्यट्क यात फरकच कळत नाही. अर्थात आपणच कुठलीही घाण तिथे करणार नाही, प्लॅस्टीक, थर्माकोलच्या पिशव्या, ग्लास टाकणार नाही ह्याची काळजी घेतली, स्वत:च्या वागण्यावर जर नियंत्रण ठेवले तर आपोआपच अनेक प्रश्न सुटतील.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

Friday, October 8, 2010

किटकभक्षी ड्रॉसेरा.

खरेतर झाडांना किटकांची नेहेमीच त्यांच्या परागीभवनासाठी मदत होत असते त्यामुळे त्यांचे कायमच मित्रत्वाचे संबंध असतात. पण प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसेच याही बाबतीत आहेत. काही काही झाडे चक्क मांसाहारी असतात आणि त्यांना त्यांच्या खाण्यासाठी हे किटक लागतात. इतर वेळी झाडे प्राणि, पक्ष्यांना अन्न पुरवत असतात. मात्र या झाडांच्याबाबतीत हे उलटसुद्धा होते. काही विशिष्ट जातीच्या वनस्पती मात्र प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न निर्मीती न करता त्यांना खाण्यासाठी सजीव जीवांची / किटकांची आवश्यकता असते. ऑर्कीड, बांडगुळ हे सुद्धा त्यांना लागणारी पोषक द्रव्ये त्यांच्या पानांमधून, मुळांमधून मिळवू शकतात मात्र ती काही दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून, त्यांना मारून, त्यांच्यावर गुजराण करत नाहीत. पण काही वनस्पती किटकांना आकर्षित करतात, त्यांना पकडतात, मारतात, त्यांची जीवनद्रव्ये शोषतातआणि पचवतात त्यांनाच खऱ्या अर्थाने किटकभक्षी वनस्पती आपण म्हणू शकतो.

किटकभक्षी वनस्पती ह्या इतर सर्वसामन्य वनस्पतींसारख्याच असतात आणि तशाच दिसतात. मात्र त्यांच्या काही खास क्लुप्त्या असतात ज्या त्यांच्या भक्षकाला सहज आकर्षित करतात आणि त्या नंतर त्यांना जखडणे, मारणे, त्यांचा जीवनद्रव शोषणे, पचवणे ह्या क्रिया सहज करतात. सर्वसामान्य वनस्पतींनासुद्धा किटकांना परागीभवनासाठी आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी आणि विविध सुगंधी फुले असतात. जे किटक त्या झाडांना खातात त्यांच्यापासून बचावासाठी काही विषारी द्रव्ये, काट्यांसारखी आयुधे असतात. जमिनीतील पोषक द्रव्ये शोषण्यासाठी मुळे असतात. किटकभक्षी वनस्पतींना मात्र हेसुद्धा गुण असतात.

या प्रकारच्या वनस्पती जास्त पाउस असलेल्या थंड आणि ओलसर चिखल असलेल्या भागात आढळतात. आपल्याकडे ही वनस्पती भीमाशंकर, कास, आंबोली घाट अश्या ठिकाणी आढळते. या वनस्पतीचा आकार जेमतेम २/३ इंच असून जमिनीलगत, गवतामध्ये असते आणि तीला बारकाईने शोधावे लागते. हिरव्या रंगाची ह्या वनस्पतीला फुले मात्र पांढऱ्या, गुलाबी किंवा भगव्या रंगाची असतात. ही विशिष्ट वनस्पती वार्षिक आहे. ती तीच्या विशिष्ट हंगामात उगवते, वाढते आणि फुले आल्यावर परागीभवन होऊन त्यांची बिजे खाली जमिनीत पडतात आणि त्यानंतर ते झाड मरते. पुढच्या वर्षी त्याचा जीवनक्रम असाच पुढे सुरू रहातो.

आपल्याकडे या किटकभक्षी वनस्पतीच्या ड्रॉसेरा इंडीका आणि ड्रॉसेरा बर्मानी या दोन जाती आढळतात. ह्या वनस्पतीच्या पानांवर, फांद्यांवर चिकट असे आकर्षक, गोड वासाचे थेंब असतात. आता त्यांना पाने म्हणण्यात अर्थ नाही कारण ती काही इतर पानांसारखी पसरट नसतात तर ती जेमतेम काट्यासारखी केसाळ लव आलेली असते आणि त्यावर दवबिंदू पडल्यासारखे किटकांना आकर्षित करणारे चिकट थेंब असतात. याच कारणासाठी त्यांना “दवबिंदू”, “ड्यू ड्रॉप्स”, “सन ड्यू” अशी अनेक नावे आहेत. या त्यांच्या चिकट द्रावावर बारीकसारीक किटक आकर्षित होतात आणि त्याला चिकटतात. या नंतर झाड काही वेळा पानाला वळवून त्या किटकाला जखडून ठेवायचासुद्धा प्रयत्न करते. यानंतर झाडातून पाचक द्रव स्त्रवून त्या किटकाच्या शरीराचे विघटन करायला सुरवात करतात आणि थोड्याच वेळात त्याच्या शरीरातील उपयोगी असे सर्व जीवनद्रव शोषून घेऊन जेमतेम त्याचा सांगाडा बाहेर शिल्लक ठेवतात.

ड्रॉसेरा बर्मानी वनस्पतीची रचना तर एखाद्या फुलासारखी असते. या वनस्पतीचा आकार जेमतेम २/३ सें.मी. एवढाच असतो आणि ती अगदी जमिनीलगत सपाट वाढते. अगदी कमळाच्या फुलांच्या पाकळ्यासारखीच ती दिसतात. यांचा रंग आकर्षक गुलाबी, लाल असतो आणि त्यांच्या कडांना बारीक केस असून त्यावर ते किटकांना आकर्षणारे दवबिंदू असतात. १७३७ मधे श्रीलंकेमधे जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पातीचा शोध लावला म्हणून ही “बर्मानी”. या बर्मानीची ती किटकभक्षी टोके अगदी १८०० अंशात दहा सेकंदाच्या आत वळून किटकाला पकडू शकतात

नुकताच कासला वन्य फुले बघायला गेलो असताना अगदी मुख्य रस्त्याच्या कडेलाच मी या वनस्पती शोधल्या. आम्ही ड्रॉसेरा इंडीका शोधत होतो कारण या काळात ती येते हे मला माहित होते पण ड्रॉसेरा बर्मानी मात्र ऑक्टोबर नंतर येते अशी माहिती मला मिळाली होती पण नवलाची गोष्ट अशी की मला मात्र एकाच जागी या दोन्ही वनस्पती अगदी शेजारी शेजारी चिकटून आलेल्या दिसल्या. बर्मानीचे वर्णन मला माहित असल्यामुळे मला तीला लगेच ओळखता आले. आम्ही त्यांचे छायाचित्रण करत असतानाच शेजारच्या ड्रॉसेरा इंडीकावर एक भला मोठी किटक आला आणि काही क्षणातच तिने आजूबाजूच्या फांद्या एखाद्या ऑक्टोपससारख्या त्याच्या शरीराभोवती आवाळल्या. त्या किटकाचा आकार त्या वनस्पतीच्या आकारापेक्षा मोठा होता, त्याला पाय आणि पंखसुद्धा होते पण तो तरीसुद्धा त्या दवबिंदूच्या विळख्यातून काही सुटू शकला नाही.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com